मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मेट्रो ९ (दहिसर पूर्व – मीरा-भाईंदर) मार्गावरील प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर प्रवास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. याअंतर्गत मेट्रो ९ मार्गावर सात नवीन पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) उभारण्यात येणार आहेत.
सुमारे ११ किलोमीटर लांबीच्या आणि ८ स्थानकांच्या या मार्गावर उभारण्यात येणारे हे पूल एमएमआरडीएच्या *मल्टी-मोडल इंटिग्रेशन (एमएमआय)* उपक्रमाचा भाग असून, मेट्रो स्थानकांपर्यंत सुरक्षित व अखंड जोडणी उपलब्ध करून देण्याचा त्यामागील उद्देश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि राज्याचे मुख्य सचिव तथा एमएमआरडीएच्या २८६ व्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ. संजय मुखर्जी भा.प्र.से. महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांच्या देखरेखीखाली या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे.
मेट्रो २अ आणि ७ मार्गांवर यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या मल्टी-मोडल इंटिग्रेशन उपक्रमाच्या धर्तीवर मेट्रो ९ मार्गासाठीही ही सुविधा विकसित करण्यात येणार आहे. यामुळे विविध सार्वजनिक वाहतूक साधनांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधला जाईल तसेच स्थानकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.
पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि मीरा-भाईंदर रोड हे मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत वर्दळीचे मार्ग आहेत. ३० ते ६० मीटर रुंदीचे हे रस्ते आणि त्यावरील मोठ्या प्रमाणातील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पूल उभारणे आवश्यक ठरले आहे.
उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलांची ठिकाणे
पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH)
१) दहिसर टोलनाका – १४५ मीटर
२) मिरागाव – ८७ मीटर
मीरा-भाईंदर रोड
३) काशीगाव – ९२ मीटर
४) शिवार गार्डन – ८० मीटर
५) मॅक्सस मॉल – ८३ मीटर
६) वेज सागर हॉटेल – ८८ मीटर
७) साईबाबा नगर – ८० मीटर
पुलांची प्रमुख वैशिष्ट्ये
प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयी लक्षात घेऊन सर्व पुलांमध्ये खालील सुविधा उपलब्ध असतील :
* जिने
* दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी लिफ्ट सुविधा
* सीसीटीव्ही निगराणी व्यवस्था
सर्व प्रस्तावित पुलांची रुंदी ३ मीटर असेल.
नागरिकांना आणि प्रवाशांना होणारे फायदे
या पादचारी पुलांमुळे :
* गजबजलेल्या रस्त्यांवर सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे शक्य होईल
* पादचारी अपघातांचा धोका कमी होईल
* मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल
* स्थानक परिसरातील प्रवासी हालचाली अधिक सुरळीत होतील
* गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल
* मेट्रो आणि इतर वाहतूक सेवांमधील जोडणी अधिक मजबूत होईल
* शेवटच्या टप्प्यातील (लास्ट माईल) कनेक्टिव्हिटी सुधारल्याने मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल
याशिवाय, व्यस्त चौकांवरील सिग्नल क्रॉसिंगवरील पादचाऱ्यांचा भार कमी होऊन वाहतुकीचा प्रवाहही अधिक सुरळीत राहण्यास मदत होईल.
मेट्रो ९ मार्गावरील नागरी कामे अंतिम टप्प्यात असून पहिला टप्पा ७ एप्रिल २०२६ रोजी सुरू करण्यात आला आहे. पूर्ण मेट्रो सेवा सुरू होताच नागरिकांना सुरक्षित पादचारी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमएमआरडीएकडून या पुलांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत.
या कामांच्या अंमलबजावणीसाठी *मेसर्स स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर जेव्ही – मेसर्स पीआरएस इन्फ्राप्रोजेक्ट्स एलएलपी* या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, सुमारे *₹८२.०९ कोटी* खर्चातून हे सात पादचारी पूल उभारले जाणार आहेत.
हे पूल उभारून एमएमआरडीए सुरक्षित, सुलभ आणि प्रवाशाकेंद्रित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या आपल्या उद्दिष्टाला अधिक बळकटी देत आहे. मेट्रो ९ मार्गाशी जोडलेली ही पायाभूत सुविधा मुंबई महानगर प्रदेशातील शहरी गतिशीलता अधिक सक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख बनविण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मुंबईकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका;’मेट्रो 9 आणि 2बी …
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“मुंबईतील मेट्रो जाळ्याचा विस्तार जितका महत्त्वाचा आहे, तितकेच प्रवाशांना या सेवांपर्यंत सुरक्षित आणि सुलभ पोहोचता येणेही महत्त्वाचे आहे. मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या घरांपासून, कार्यस्थळांपासून आणि परिसरातून मेट्रो स्थानकांशी प्रभावी जोडणी मिळत आहे. महाराष्ट्रात दरवर्षी जवळपास ५० किलोमीटर नवीन मेट्रो मार्ग जोडले जात आहेत. आमचे ध्येय केवळ मेट्रो मार्ग उभारणे नसून प्रवाशांसाठी अखंड, सोयीस्कर आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे आहे. मेट्रो ९ मार्गावरील हे पादचारी पूल त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.”
मा. उपमुख्यमंत्री व अध्यक्ष एमएमआरडीए एकनाथ शिंदे म्हणाले,
“कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे यश केवळ त्या प्रकल्पावर अवलंबून नसून नागरिकांना ती सेवा किती सहज आणि सुरक्षितपणे वापरता येते यावरही अवलंबून असते. मेट्रो ९ मार्गावरील हे पादचारी पूल सुरक्षितता, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा सुविधा सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविण्यास आणि अधिक सक्षम, जोडलेला मुंबई महानगर प्रदेश घडविण्यास मदत करतील.”
वाहतूक कोंडीला दिलासा! मुंबई-ठाणे प्रवास होणार सोपा; वडाळा-कासारवडवली …
डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले,
“आधुनिक शहरी वाहतूक व्यवस्थेमध्ये मल्टी-मोडल इंटिग्रेशन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मेट्रो ९ मार्गावरील प्रस्तावित पादचारी पूल नागरिकांच्या सुरक्षित हालचाली, स्थानकांपर्यंत सुलभ पोहोच आणि प्रवाशांच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी नियोजनपूर्वक विकसित करण्यात आले आहेत. या सुविधांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल, तसेच मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल.”






