काँग्रेसच्या सोशल मीडिया, ओबीसी, एससी व अल्पसंख्यांक विभागाच्या नवनियुक्त तालुकाध्यक्षांची कार्यशाळा
राज्यात काँग्रेसची पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सक्रिय करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या संघटन सृजन अभियानांतर्गत सात हजार नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. या नवनियुक्त पदाधिका-यांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्षाचे मुख्यालय दादरच्या टिळक भवनमध्ये दिनांक २६ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत ओबीसी, अल्पसंख्याक, एस.सी. व सोशल मीडिया विभागासाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार, जनसंपर्क, सोशल मीडिया संवाद, बूथस्तरीय नियोजन आणि विविध समाजघटकांशी समन्वय यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनीही यावेळी पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
या कार्यशाळेला प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध वनकर, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश शेट्टी, सरचिटणीस गुरबिंदर बच्चर, अभिजित सपकाळ, सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष हृषिकेश पाटील, प्रवक्ते हनुमंत पवार आदी उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आशुतोष शिर्के, निमिष साने, यांच्या पुढाकाराने या कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध R.J. संग्राम खोपडे यांनीही मार्गदर्शन केले.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “पुण्यात विषारी दारुने २२ जणांचा बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली असून हातभट्या तोडण्याची कारवाई केली जात आहे. या हातभट्ट्या काही रात्रीतून उभ्या राहिलेल्या नाहीत. राज्यात ५०० शहरे व ४३ हजार गावखेडी आहेत, या ठिकाणी अवैध धंदे व हातभट्या राजरोस सुरु आहेत. गुजरातचे महाराष्ट्रात येणारे ड्रग्ज, जामतारा सारखे प्रकरण व अवैध धंद्याचे रॅकेट राजरोस सुरु असून त्याला गृहविभागाचा आशिर्वाद आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिद वाक्यच बदलले आहे. पुण्यातील प्रकरणाने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात असल्याने स्वतःची अब्रु वाचवण्यासाठी आता कारवाईचे नाटक केले जात आहे” असे ते म्हणाले.






