११ दिवसांत इंधन 8 रुपयांनी महाग! सिंधुदुर्ग काँग्रेसचे निवेदन, दरवाढ मागे घेण्याची मागणी
निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या ११ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तब्बल ८ रुपये प्रति लीटर इतकी वाढ करण्यात आली आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा प्रकार आहे. गेल्या १२ वर्षांचा विचार करता पेट्रोलच्या किमतीत ३८ टक्के, तर डिझेलच्या किमतीत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
PCMC Toxic Liquor Case: दारूत मिसळलेला ‘तो’ एक रासायनिक पदार्थ…; ज्याने घेतले 8 जणांचे बळी
काँग्रेसने आपल्या निवेदनात युपीए (UPA) सरकारच्या काळातील दरांची तुलना सध्याच्या परिस्थितीशी केली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचले असतानाही, देशात पेट्रोल-डिझेलचे दर ७२ रुपयांच्या वर जाऊ दिले नाहीत. तत्कालीन सरकारने महागाईचा भार जनतेवर पडू दिला नाही. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ५०-५५ डॉलर्सच्या आसपास असतानाही देशात पेट्रोल १०० रुपयांच्या वर विकले जात असल्याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
“गेल्या १२ वर्षांत केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनावरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून तब्बल ४३ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. इतकेच नव्हे तर, मागील अवघ्या ४-५ दिवसांत केलेल्या ४ रुपयांच्या दरवाढीमुळे भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांनी बाजारातून अवघ्या काही तासांत १२,४०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही नफेखोरी म्हणजेच जनतेच्या खिशावर उघड दरोडा आहे,” असा घणाघाती आरोप काँग्रेसने केला आहे.
डिझेलच्या दरवाढीमुळे आणि राज्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सुरू असलेल्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, मात्र डिझेलअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतीची कामे वेळेत झाली नाहीत तर अन्नधान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन पुन्हा महागाई वाढेल, अशी भीती निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
* पेट्रोल आणि डिझेलची केलेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी.
* सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा विनाअडथळा आणि सुरळीत करावा.
* महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत.
या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार न झाल्यास आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी दिला आहे.






