कांदा उत्पादकांचा संताप फुटला! टाकळी ढोकेश्वरमध्ये महामार्गावर कांदा ओतून 'रस्ता रोको'; अहिल्यानगर जिल्हा पेटणार?
पोपट पिटेकर,टाकळी ढोकेश्वर,अहिल्यानगर : “कांद्याचे भाव घसरले, शेतकऱ्यांचे संसार मोडले!” अशा संतप्त घोषणा देत आज पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. भररस्त्यात कांदा ओतून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संघर्ष छेडला जाईल.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात झालेली मोठी घसरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. याच अन्यायाविरोधात आज सकाळी ९:३० वाजल्यापासून टाकळी ढोकेश्वर येथील मुख्य चौकात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.
पुढील वर्षी 15 लाख घरांच्या वितरणाचे उद्दिष्ट; साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
कांद्याला तातडीने रास्त हमीभाव लागू करा.
प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा.
निर्यात धोरण स्थिर ठेवा आणि जाचक अटी रद्द करा.
प्रत्येक तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करून साठवणूक क्षमता वाढवा.
“शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. आज हे आंदोलन फक्त एका गावात आहे, पण जर सरकारने कांदा प्रश्नी तात्काळ तोडगा काढला नाही, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा चक्काजाम करू,” असा आक्रमक इशारा यावेळी उपस्थित नेत्यांनी दिला.
भररस्त्यात कांदा फेकून देण्यात आल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामुळे आता सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देणार की आंदोलन अधिक चिघळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असतानाही कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून टाकळी ढोकेश्वर येथील मुख्य चौकात शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते एकत्र जमले. आंदोलनादरम्यान रस्त्यावर कांद्याच्या गोण्या ओतण्यात आल्या आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, निर्यातबंदीवरील निर्बंध शिथिल करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर संघर्ष उभारला जाईल, असा इशाराही देण्यात आला.






