सौजन्य - नवराष्ट्र टीम
पाटस : दौंड तालुक्यातील वरवंड येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक व्हिक्टोरिया तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे या तलावातील माती आणि मुरूम उत्खनन करण्यासाठी स्थानिक माफियांनी सपाटा लावला आहे. काही पाटबंधारे आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी सुरू आहे. या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितावर कारवाई करण्यासाठी दौंड तहसीलदार, वनपरिक्षेत्राधिकारी आणि यवत पोलीस स्टेशनला कारवाई करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता उत्कृर्ष पाटील यांनी दिली.
पाटबंधारे विभागाच्या पाटस येथील कार्यालयाच्या देखरेखीखाली वरवंड येथील व्हिक्टोरिया तलाव आहे. सध्या तलावातील पाणीसाठा पाणीसाठा जवळजवळ संपुष्टात आल्याचे चित्र आहे. परिणामी पाणीसाठा कमी झाल्याने तलावात स्थानिक आणि आजुबाजूच्या काही माती आणि मुरूम माफियांनी जेसीबी मशीन व ट्रॅक्टर आणि पोकलेन तलावात उतरवले आहेत. तलावातील माती अनधिकृतपणे उपसा करून वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यातून वाहतूक केली जात आहे. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन माती उपसा करत असलेले मशीन घटनास्थळी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पुरेसे कर्मचारी नसल्याने मशीन अडवून ठेवण्यात यश आले नाही. या मशीनद्वारे अंदाजे १०० ब्रास माती अनधिकृतपणे उपसा केल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीही काही जण रात्रीच्या सुमारास माती आणि मुरूम उत्खनन करीत आहेत.
माती माफिया, ट्रॅक्टर व मशीन मालकावर कारवाईची मागणी
शासनाच्या मालमत्तेवर हे माफिया खुलेआम गौण खनिजाची चोरी करीत आहेत. हा प्रकार भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा आहे. त्यामुळे या मुरुम आणि माती चोरी केल्याप्रकरणी संबंधित माती माफिया आणि ट्रॅक्टर व मशीन वर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार पाटबंधारे विभागाने यवत पोलीस ठाणे, दौंड तहसीलदार आणि दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी पाटील यांनी दिली.
जलवाहिनीच्या पाईप तुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
दरम्यान, काही राजकीय मंडळींचा या माती चोरीत सहभाग असल्याने मोठ्या नेत्यांच्या राजकीय दबावतंत्राचा वापर करत ते पाटबंधारे विभाग, महसूल विभाग, वन विभाग यांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे चित्र आहे. आपल्यावर मोठ्या नेत्याचा आशीर्वाद असल्याने आपल्यावर कोण कारवाई करणार आणि कोणाची हिंमत आहे, अशा आवरभावात हे माफिया तलावात लगतच्या शेतकऱ्यांच्या शेत पिकातून भरधाव वेगाने मातीने भरलेले वाहने चालवत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नेलेल्या जलवाहिनीच्या पाईप तुटल्याने नुकसान झाले आहे. सध्या या मातीला वीटभट्टी व्यवसायिकांडून मोठी मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र आहे.






