संग्रहित फोटो
आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यावर झालेला परिणाम आणि वाढते खर्च यामुळे ही दरवाढ अटळ असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ही तात्पुरती भाडेवाढ १५जून पर्यंत राहणार असून, त्यानंतर दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
लांब पल्ल्याचा प्रवास महागला
या दरवाढीमुळे रत्नागिरी विभागातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे दर लक्षणीयरीत्या वाढले आहेत. रत्नागिरी ते मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना आता ६२ रुपये अधिक द्यावे लागतील, तर बोरिवलीसाठी ६५ रुपये आणि पुणे प्रवासासाठी ५७ रुपये जादा मोजावे लागतील. लांजा येथून अक्कलकोटसाठी ५० रुपये आणि धाराशिवसाठी ५५ ते ६० रुपयांनी तिकीट महागले आहे. गुहागर-मुंबई, दापोली पुणे आणि संगमेश्वर-मुंबई या मार्गांवरही ३६ ते ६५ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
प्रवासी संघटनांची नाराजी
दिलासादायक बाब म्हणजे निमआराम, शयनयान आणि शिवशाही बसच्या दरांमध्ये केवळ दोन रुपयांची नाममात्र वाढ करण्यात आली आहे. महामंडळाच्या या निर्णयावर विविध राजकीय पक्षांनी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, सर्वसामान्यांच्या प्रवासावर गदा येत असल्याची टीका होत आहे. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडलेले असताना, आता सरकारी बसचा प्रवासही महागल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
स्वच्छता अधिभारही लागू
केवळ भाडेवाढच नाही, तर आता स्वच्छतेचा भारही प्रवाशांच्या पदरी पडणार आहे. एसटी बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी महामंडळाने स्वच्छता अधिभार लागू केला आहे. १५ एप्रिलपासून प्रत्येक तिकीटधारी प्रवाशाकडून दोन रुपये अतिरिक्त वसूल केले जाणार आहेत. यामुळे प्रत्येक प्रवासागणिक प्रवाशांना मूळ भाड्यापेक्षा जास्त रक्कम खर्च करावी लागणार आहे.






