सौजन्य - नवराष्ट्र टीम
Baramati Bypoll Election Result 2026 : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीत ७१.८६ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात तीन लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यापैकी दोन लाख २४ हजार ८७ मतदारांनी मतदान केले. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये निरुत्साह राहिल्याने सुमारे ५८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी विरोधकांना मागे टाकत मोठी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर सुनेत्रा पवार २६,७७३ मतांनी आघाडीवर आहेत. या आघाडीमुळे बारामतीत विरोधकांचे आव्हान सध्यातरी कमकुवत झाल्याचे दिसत आहे.
राहुरी पोटनिवडणूक: अक्षय कर्डिले यांचा एकतर्फी प्रभाव
भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत पोटनिवडणूक होत आहे. येथे भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत अपेक्षित होती. अक्षय कर्डिले सध्या १४,७११ मतांच्या मोठ्या फरकाने आघाडीवर आहेत.
निवडणुकीची पार्श्वभूमी
या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न झाले होते, मात्र एकमत न झाल्याने मतदान प्रक्रिया राबवावी लागली. राहुरीतून एकूण ७ उमेदवार नशीब आजमावत आहेत. सद्यस्थिती पाहता बारामती आणि राहुरी या दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांनी विजयाच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे.
सुनेत्रा पवार यांची सोशल मीडियावरील पोस्ट
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असताना, आपण मतदानाच्या माध्यमातून दाखवलेल्या विश्वासाला मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना अर्पण करते. आज हा निकाल जाहीर होत असताना, आदरणीय दादांच्या आठवणी पुन्हा उजळून निघाल्या असून आपण सर्वजण भावूक झालो आहोत. दादांवर अपार प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, या विजयाच्या आनंदात कोणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. बारामतीकरांनी मला दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते. ही शेवट नाही, तर ही एक नवी सुरुवात आहे , निश्चयाची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!






