संग्रहित फोटो
पुणे : मार्च महिन्यात पुणे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे ४ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, कृषी विभागाने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून ७ कोटी १३ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ८ हजार ५०० शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
२५० गावांना पावसाचा फटका
पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस विविध ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिठीने हजेरी लावली होती. याचा सर्वाधिक फटका अडीचशे गावांतील शेतीला बसला आहे. प्रामुख्याने बागायती आणि बहुवार्षिक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने युदधपातळीवर काम करत नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला आहे.
भरपाईचे निकष जाहीर
जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी तयार केलेला हा अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मान्य केला असून, तो विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला आहे. शासनाच्या २७ मार्च २०२३ च्या निर्णयानुसार ही मदत दिली जाणार आहे. यामध्ये खालीलप्रमाणे भरपाई प्रस्तावित आहे.
कोरडवाहू पिके : ८,५०० रुपये प्रति हेक्टर
बागायती पिके : १७,००० रुपये प्रति हेक्टर
बहुवार्षिक पिके (फळबागा) : २२,५०० रुपये प्रति हेक्टर
शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे
अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने आपला अहवाल सादर केल्यामुळे आता राज्य सरकार या निधीला कधी मंजुरी देते आणि प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाधित क्षेत्र : ४,००० हेक्टर
बाधित शेतकरी : ८,५००
एकूण मागणी : ७ कोटी १३ लाख रुपये
बाधित गावे : २५०






