आळेफाटा पूर्व भागातील टोमॅटो संकट गडद (File Photo : Tomato)
आळेफाटा : आळेफाटा पूर्व भागातील मंगरूळ, पारगाव, तांबेवाडी, बेल्हेसह आसपासच्या गावांमध्ये टोमॅटो पिकांवर रोगांचा तीव्र प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अचानक वाढलेले तापमान, उष्णतेची लाट आणि बदलते हवामान यामुळे करपा (ब्लाइट), लाल कुळी (माइट्स), भुरी तसेच ‘अक्सा’सारख्या रोगांनी टोमॅटो पिकांवर अक्षरशः आक्रमण केल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच तीव्र उन्हाचा तडाखा जाणवत असून, त्याचा थेट परिणाम टोमॅटो पिकांच्या वाढीवर होत आहे. अनेक शेतांमध्ये पानांवर काळपट डाग, पिवळेपणा, पाने वाळणे, झाडांची वाढ खुंटणे तसेच फळांची गुणवत्ता घटणे अशी लक्षणे मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. काही ठिकाणी तर संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रोग नियंत्रणासाठी शेतकरी सातत्याने बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. मात्र, चार ते पाच वेळा औषध फवारणी करूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परिणामी, औषधांवरील खर्च झपाट्याने वाढत असून आधीच वाढलेल्या खत, मजुरी आणि पाणी व्यवस्थापनाच्या खर्चात आणखी भर पडत आहे.
दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मिश्र फवारणी टाळणे, सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करणे, ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे योग्य नियोजन करणे तसेच रोगट झाडे त्वरित काढून नष्ट करणे याबाबत सूचना दिल्या जात आहेत. अतिरिक्त आर्द्रता नियंत्रणात ठेवणे आणि संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांची लाखोंची गुंतवणूक धोक्यात
मंगरूळ-पारगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात मोठ्या अपेक्षेने टोमॅटो लागवड केली होती. मात्र, सतत बदलणारे हवामान आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी तर लाखो रुपयांची गुंतवणूक धोक्यात आल्याचे सांगितले.
टोमॅटो उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आळेफाटा आणि माळशेज घाट परिसरात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे यंदाच्या हंगामातील उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.
“यंदा तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने करपा, लाल कुळी आणि भुरीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. औषधांवर मोठा खर्च करूनही रोग पूर्णपणे नियंत्रणात येत नाहीत,”
– तुकाराम चव्हाण, प्रगतशील शेतकरी






