Minister Pratap Sarnaik: रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत; प्रताप सरनाईकांचा थेट इशारा
Pratap Sarnaik News: जेव्हा रिक्षाचालक-टॅक्सीचालकांना परवाना दिला, बेंच दिले जाते, तेव्हा त्यात नमूदच आहे. शासनाचा जुनाच नियम आहे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान असलेच पाहिजे. रिक्षा किंवा टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाशी मराठीत बोलता आले पाहिजे. किमान त्याची भाषा तुम्हाला आणि तुमची भाषा त्याला समजली पाहिजे. मराठीचे व्यावहारिक ज्ञान तुम्हाला नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात काम करण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १६ ऑगस्टनंतर मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘नवभारत-नवराष्ट्र द्वारे आयोजित ‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी सक्तीच्या मुद्यावर परिवहन विभागाने सायबर पोलिसाना अॅपवर बंदी घालण्यासंदर्भात एक पत्र दिले होते, त्या पत्राच्या अनुषंगाने उडालेल्या गोंधळानंतर ते पत्र मागे घेण्यात आले आणि दुसरे पत्र सायबर पोलिसांना दिले गेले, त्याबाचतचा किस्साही त्यानी यावेळी सांगितला, भविष्यात ओला आणि उबेर चालकांसाठीदेखील मराठी सक्तीचा नियम लागू करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
“नवभारत’ मुंबईचे स्थानिक सहाय्यक संपादक ब्रजमोहन पांडे आणि “नवराष्ट्र चे पुणे निवासी संपादक अनिकेत जोशी यानी त्याची मुलाखत घेतली आणि विविध मुद्यांवर त्यांना बोलते केले. सरनाईक पुढे म्हणाले की, आम्ही खूप वेळ दिला आहे. पुस्तिका दिली आहे, आम्ही मराठी शिकवायला तयार आहोत, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद यासारख्या संस्था त्याना शिकवायला तयार झालेल्या आहेत, मराठी आलेच पहिजे. देशातील प्रत्येक राज्यातून लोक मुबई- महाराष्ट्रात आलेले आहेत. केवळ उत्तर प्रदेश, बिहारमधूनच लोक आलेले नाहीत.






