फोटो सौजन्य - Social Media
महाबळेश्वर : महाड-पोलादपूर मार्गावरील चेक नाक्यावर वनविभागाने धाडसी कारवाई करत अवैध खैर लाकडाची वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडली आहे. या कारवाईत तब्बल ६१,४२५ रुपयांचा ३.१५ घनमीटर खैर माल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
बुधवार, २२ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. महाड-पोलादपूर चेक नाक्यावर कर्तव्यावर असलेल्या वनरक्षक शालिनी कोहळे यांनी संशयित अशोका लेलॅण्ड पिकअप (क्र. MH-01-LA-8878) गाडीला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. चालकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेत कोहळे यांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग केला आणि काही अंतरावर गाडी अडवण्यात यश मिळवले.
वाहनाची तपासणी केली असता, त्यात अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेला खैर लाकडाचा साठा आढळून आला. यानंतर वनविभागाने तातडीने कारवाई करत वाहनासह माल जप्त केला. या प्रकरणी सुनिल ज्ञानदेव मर्देकर (वय ४५, रा. ओझरे, ता. जावली), विठ्ठल रामचंद्र चव्हाण (वय ४७, रा. कामठी, जि. सातारा) आणि धनाजी संपत पवार (वय ५०, रा. वेळे, जि. सातारा) या तिघांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. आरोपींनी प्राथमिक चौकशीत आपला गुन्हा कबूल केला असून, त्यांच्यावर वनगुन्हा क्र. ०१/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली पिकअप गाडीही जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
ही कारवाई सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंधळ आणि महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनरक्षक शालिनी कोहळे यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई यशस्वी ठरली. या प्रकरणाचा पुढील तपास महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे करत आहेत. दरम्यान, वनविभागाने नागरिकांना इशारा दिला आहे की अवैध लाकूड वाहतूक, शिकार किंवा वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. जंगलात प्लास्टिक कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे किंवा अतिक्रमण करणे यावरही कडक कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर हालचाली आढळल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.






