Raigad Zilla Parishad राज्यात दुसऱ्या क्रमांकावर; ‘माझी वसुंधरा’त दमदार कामगिरी
१ ते १.५ हजार लोकसंख्या गटांत खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक (बक्षीस १ कोटी) व भूमी थीमॅटिकमध्ये राज्यात उच्चतम कामगिरीचा प्रथम क्रमांक (बक्षीस ५० लक्ष) अशी १.५० कोटीची बक्षीसे पटकवली आहेत. तसेच ५ ते १० हजार लोकसंख्येत राज्यस्तरावर खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक व १ कोटीचे बक्षीस पटकवले आहे. याशिवाय ६ ग्रामपंचायतींनी कोकण विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून प्रत्येकी ५० लक्षचे बक्षीस मिळवले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड व तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात आले आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध गावे हिरीरीने भाग घेत असून यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे. राज्यपातळीवर उत्कृष्ट ठरलेल्या ग्रामपंचायतींचा, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकार्यांचा सत्कार मुंबईत शनिवार (ता.२१) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्यात १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या गटात वासांबे ग्रामपंचायत, ५ ते १० हजार लोकसंख्येत चैक ग्रामपंचायत, ३ ते ५
हजार लोकसंख्येत तांबाटी ग्रामपंचायत, २ ते ३ हजार लोकसंख्येत तुपगाव ग्रामपंचायत, १.५ ते २ हजार लोकसंख्येत वडवळ ग्रामपंचायत व १ ते १.५ हजार लोकसंख्येत नारंगी ग्रामपंचायतीने यश मिळविले. तसेच कोकण विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारीचा पुरस्कार खालापूर पंचायत समितीच्या संदीप कराड व जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकाऱ्यांचा पुरस्कार पोलादपूरच्या दिप्ती घाट व रोह्याच्या शुभदा पाटील यांना मिळाला आहे.






