राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर ,अजित पवार गट जिल्हाध्यक्षांविरोधात नाराजीचे सूर
पनवेल/ दीपक घरत : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष पनवेल शहराच्या जिल्हाध्यक्षांविरोधात प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.राष्ट्रवादी पक्षातील प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ कार्यकर्ते विद्यमान जिल्हाध्यक्षांविरोधात एकवटले आहेत. जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे पक्षात कोणत्याही क्षणी मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे असं इतर सदस्यांचं म्हणणं आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीला – पनवेल शहर जिल्हाध्यक्ष जबाबदार असल्याचे खाजगीत बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. याबाबत पक्षनेतृत्वाकडे देखील नाराजीची कारणे स्पष्ट करण्यात आली होती. मात्र शीर्ष नेतृत्वाकडून कोणताही हस्तक्षेप न करता दुर्लक्ष केले जात असल्याने पदाधिकाऱ्यांची ही नाराजी विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-बच्चू कडू अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; 4 तारखेला करणार गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शरद पवार व अजित पवार गट असे दोन गट पडले. खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पनवेल मधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. तर जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासोबत ठाम राहणे पसंत केले. मधल्या काळात तत्कालीन पनवेल शहर राष्ट्रवादीचे जिल्ह्याध्यक्ष सतीश पाटील यांनी सुनील तटकरे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात घरवापसी केली. त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदी सुनील तटकरे यांनी पनवेल शहर जिल्ह्याध्यक्षपदाची सूत्रं महादेव पाटलांच्या हाती दिली.
हेही वाचा-“उद्धव ठाकरेंनी कितीही पाळीव प्राणी सोडू दे महायुती…”, नितेश राणे यांचा घाणाघात
या जबाबदारीबद्दल पहिल्या दिवसापासूनच नाराजीची धुसफूस पक्षामध्ये पाहायला मिळत होती. काही ठिकाणी खाजगीत तर काही ठिकाणी उघडपणे जिल्हाध्यक्षांविरोधात रोष पाहायला मिळत होता. पक्षात मान सन्मान न देणे, पक्ष बैठीकला न बोलावणे, मित्र पक्षाच्या आमंत्रणाला एकटे जाणे, तसेच पक्षासाठी कोणतेही कार्यक्रम न घेणे, अशा अनेक तक्रारी पक्षातील जबाबदार पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला होता.






