टोरंट वीज प्रकल्प, पोशीर धरण आणि शिलार धरण यामुळे होणारे पर्यावरण नुकसान आणि कर्जतचे हरितपण अबाधित ठेवण्यासाठी कर्जत बचाव समिती कार्य करीत आहे. या समितीच्या माध्यमातून आज कर्जत येथे लोकमान्य टिळक चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. टोरेंट’ प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा विनाश होणार आहे. टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित 932 एकर प्रकल्पावर आंदोलकांनी तीव्र आक्षेप घेतला. यातील 600 एकर जागा ही थेट घनदाट वनविभागाची आहे. पश्चिम घाटातील हा अत्यंत संवेदनशील क्षेत्र असून, येथे लाखो झाडे तोडली जाणार आहेत, ज्यामुळे येथील वन्यजीव आणि वनस्पती धोक्यात येतील. भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्याला गेल्या 20 वर्षांपासून वनविभागाकडून मंजुरी मिळत नव्हती, मग खाजगी टोरेंट कंपनीसाठी वनविभागाने तातडीने ‘रेड कार्पेट’ कसे अंथरले? असा थेट सवाल आंदोलनादरम्यान उपस्थित करण्यात आला. तसेच हायटेन्शन वीज वाहिन्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असून भविष्यात त्यांच्या जमिनींचे मूल्य कमालीचे घटणार आहे.
Raigad News: उकाड्यामुळे ग्राहक घरातच; महाड बाजारपेठेतील वर्दळ घटली, व्यापारी चिंतेत
कर्जत वाचवण्यासाठी या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अॅड. कैलास मोरे यांच्या मदतीला जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे तसेच राजकारण विरहित समितीचे कार्यकर्ते बाजीराव दळवी,रंजन दातार,राजाभाई कोठारी,उमेश गायकवाड,ॲड योगेश देशमुख, कृष्णा जाधव,सचिन गायकवाड, मालू निरगुडा,जितरत्न जाधव,नॅन्सी गायकवाड,बंडू तुरडे, पप्पू देशमुख,राजाराम शेळके,रामदास घरत,अनिल वाघमारे, स्विटी बार्शी, सरपंच वाघमारे आदीसह अनेक कार्यकर्ते शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी ॲड कैलास मोरे यांनी प्रशासनावर आणि लोकप्रतिनिधींवर कडाडून टीका केली. तालुक्यात ब्रिटिशाकालीन पळसधरी डॅम, 31 वर्षांपासून रखडलेला पाली-भूतवली डॅम, आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कोंढाणा धरण यांसारखे मोठे प्रकल्प आहेत. याशिवाय पोशीर आणि शिलार तसेच टोरेंट कंपनीचे दोन मोठे पंप स्टोरेज प्रोजेक्ट असे मिळून तालुक्यात तब्बल 9 धरणे उभी राहत आहेत. मात्र, या सर्व धरणांमधील पाण्याचा 1 टक्काही वाटा स्थानिक कर्जतकरांच्या नशिबी नाही. कोंढाणा आणि पोशीर-शिलारचे सर्व पाणी थेट मुंबई आणि नवी मुंबई महानगर क्षेत्रासाठी वळवले जात असून, स्थानिक शेतकरी आणि नागरिक मात्र पाण्याच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
दरम्यान कर्जतचा निसर्ग आणि हिरवळ पाहण्यासाठी संपूर्ण जगातून पर्यटक येथे येतात. येथील भूमिपुत्रांनी उभारलेल्या रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसच्या माध्यमातून हजारो स्थानिकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, हीच नैसर्गिक हिरवळ उध्वस्त करून सरकार येथे खाजगी कंपन्यांचे प्रकल्प लादत आहे. हा सर्वात मोठा विनोद आहे,अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली. तर हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या क्रांतीचा इतिहास लाभलेल्या कर्जत तालुक्यात केवळ व्हॉट्सॲपवर चर्चा करून चालणार नाही, तर रस्त्यावर उतरून लढावे लागेल. हे आंदोलन यशस्वी होवो वा न होवो, पण जेव्हा पुढची पिढी विचारेल की कर्जतचा ऱ्हास होत असताना तुम्ही काय करत होता? तेव्हा आम्ही छाती ठोकून सांगू शकू की आम्ही त्याविरुद्ध आवाज उठवला होता, असा निर्धार एक दिवसीय आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी बोलून दाखवला.
तहसीलदार आंदोलन स्थळी
कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव हे यावेळी सायंकाळी आंदोलन स्थळी पोहचले.तेथे सर्व आंदोलक यांनी शासनाने मध्यस्थी करून टोरंट प्रकल्पाचे सुरू असलेली सर्व कामे थांबवावी अशी मागणी केली आहे.आदिवासी लोकांच्या जमिनीत घुसखोरी,आदिवासी लोक आणि तेथील ग्रामपंचायत वर लादलेली हुकूमशाही यामुळे आधी ते वाद मिटवावेत आणि नंतरच शेतकरी स्थानिक यांचे समाधान झाल्यानंतर आंदोलन करण्याची मागणी केली.
Matheran News : स्थानिकांचा रोजगार बंद करण्याचा डाव; सुशोभीकरणाच्या नावाखाली आदिवासींच्या पोटावर पाय
निर्णय
पावसाळी अधिवेशन काळात मुंबई पायी मोर्चा…
पाच जून रोजी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नसल्याने पाच जून या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी एक झाड लावावे आणि आपले तालुक्यात वन संपदा वाढवावी असा निर्णय घेण्यात आला.तर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होईल त्यावेळी पायी मोर्चा कर्जत पासून काढला जाईल असे जाहीर करण्यात आले.






