Pen News: 197 विद्यार्थी संशयित असतांना केवळ 5 विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची औषधे का? ; नंदा म्हात्रे यांचा आरोग्य अधिकाऱ्यांना सवाल
पेण/ संतोष पेरणे : रायगड जिल्ह्यात शासनाच्या कुसुम योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांमध्ये 197 विद्यार्थी हे कुष्ठरोगी आढळले,मात्र त्यातील केवळ पाच विद्यार्थ्यांना कुष्ठरोग संबंधित औषधे देण्यात आली आहेत. दरम्यान,197 विद्यार्थी संशयित असताना आरोग्य विभागाने केवळ 5 विद्यार्थ्यांना ही औषधे का दिली आणि उर्वरित 192 विद्यार्थ्यांना कुष्ठरोगी म्हणून औषधे का दिली नाहीत असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यात कुष्ठरोग निर्मूलन करण्यासाठी कुसुम ही योजना राबवली. रायगड जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांच्या कुष्ठरोग तपासणीची माहिती सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी मागितली होती.त्यामध्ये एकूण 30 आश्रमशाळेतील 8552 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यात 197 विद्यार्थी संशयीत होते.त्यातील केवळ 5 विद्यार्थ्यांना औषध सुरू करण्यात आली होती, त्या 5 विद्यार्थ्यांपैकी खुशबू ठाकरे हिचा मृत्यू झाला आहे. मात्र सदर माहितीमध्ये खुशबू नामदेव ठाकरे या वरवने येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची मृत्यू नोंद त्या माहितीमध्ये देण्यात आलेली नाही.खुशबूच्या मृत्यूनंतर आवाज उठवला नसता तर खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूची चौकशी झालीच नसती. अकस्मात मृत्यूची नोंद होवून फाईल बंद झाली असती, असा दावा आणि आरोप नंदा म्हात्रे यांनी केला आहे. नंहा म्हात्रे यांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.
प्राप्त माहितीनुसार संशयित कुष्ठरोगी म्हणून आढळून आलेल्या किमान 197 विद्यार्थ्यांची आरोग्य विभागाने प्रथम डर्मोलॉजिस्ट यांच्याकडून तपासणी होण गरजेचे होते. ज्या विद्यार्थ्यांना औषध सुरू करण्यात आली त्याची सिकलसेल ॲनिमिया तपासणी केली अथवा नाही ह्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही एकूणच आरोग्य विभाग आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी गंभीर नाही असे दिसून येत आहे. तरी सदर विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
शासकीय आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सिकलसेल ॲनिमिया तपासणी बायोप्सी तपासणी न करता त्यांना कुष्ठरोगी ठरवण्यात आले आहे हे पूर्णपणे चुकीचे असून असे कारण करणाऱ्या आरोग्य खात्याच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे खुशबूच्या मृत्यूचा क्लिनीकल ॲनालीसेस अहवाल आणि जिल्हा आरोग्य विभाग तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचा चौकशी अहवाल पोलिसांना प्राप्त न झालेला नाही आणि त्यामुळे अजून गुन्हा दाखल नाही वास्तविक पाहता हे आरोग्य विभागाच अपयश आहे.त्यामुळे आरोग्य खात्याचे अपयश लपविण्यासाठी आश्रमशाळेतील शिक्षकांना जबाबदार धरली जात आहे.तरी ह्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यिर्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अशी सूचना राजीव गांधी पंचायतीराज संगठन राष्ट्रीय महासचिव नंदा म्हात्रे यांनी केली आहे.