शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका निलंबित ; खुशबूला कुष्ठरोगी ठरविणाऱ्या आरोग्य खात्यावर कारवाई कधी?
पेण / संतोष पेरणे : तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत चुकीची औषधे दिल्याने चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी दुर्दैवी खुशबू हिच्या मृत्यूनंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनी शासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षिका यांच्यावर निलंबनाची कारवाई आदिवासी विकास विभागाने केली आहे. दरम्यान,त्या नऊ वर्षाच्या मुलीला चुकीची औषधे देणाऱ्या आरोग्य विभागाच्या डॉक्टरांवर शासन कारवाई कधी करणार असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यानी केला असून पोलिसांची कारवाई आकस्मिक मृत्यूच्या पुढे जाणार आहे कि नाही? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
पेण तालुक्यातील तांबडी गावातील आदिवासी नऊ वर्षाची मुलगी तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती. तेथील आश्रमशाळेत16 डिसेंबर रोजी झालेल्या कुष्टरोग निर्मूलन कुसुम या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथक यांनी चौथीमध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्ठरोगी ठरवले होते.त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूचे अंगावर फोडी आल्या आणि नंतर ताप तसेच अंग सुजू लागल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेथे उपचार सुरु करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या.त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा २२ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. नऊ वर्षाच्या खुशबू हिला त्यापूर्वी कोणताही आजार नव्हता आणि तसे असताना खुशबूला कुष्ठरोगी ठरवून तिला गोळ्या देण्यात आल्या आणि त्याचा परिणाम तिच्या अंगावर फोड्या तसेच अंग सुजू लागल्याने चुकीची निदान केल्याने खुशबूचा बळी गेला आहे.
बोरगाव ग्रामपंचायत मधील तांबडी येथील खुशबू नामदेव ठाकरे हिला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले. मात्र सुदृढ असलेल्या खुशबूला आरोग्य विभागाने कुष्ठरोगी ठरवले आणि कुष्ठरोगावरील औषधे दिली गेल्यावर त्या औषधांचे साइड इफेक्ट खुशबुचे अंगावर दिसून लागले होते. १८ डिसेंबर रोजी कुष्ठरोगावरील औषधे देण्यास सुरुवात झाली आणि काही दिवसांनी ताप येणे,अंगावर फोडी येणे,अंग सुजणे आदी प्रकार दिसून येऊ लागले आणि नंतर २२ जानेवारी रोजी खुशबूचा मृत्यू झाला.या प्रकरणी पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर,कर्जत येथील आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नंदा म्हात्रे यांनी आवाज उठवला होता.हे प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केला.त्यावेळी आमदार ओगले यांनी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य विभाग तसेच आदिवासी विकास यांच्याकडून कारवाईची मागणी केली होती.
अर्थसंकल्पू अधिवेशन सुरु असतानाच पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि त्या आश्रमशाळेच्या महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांना कामात कसूर केल्याबद्दल निलंबित केले आहे.हा आदेश आदिवासी विकास विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे.त्यामुळे खुशबू ठाकरे हीच मृत्यू हा शासनाच्या हलगर्जीपणा यामुळे झाला असल्याचे सिद्ध झाले आहे.या प्रकरणात सुदृढ मुलीला कुष्ठरोगी ठरवून चुकीचे निदान करून तशी औषधे देणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? याकडे आदिवासी समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.
२२ जानेवारी २०२५ रोजी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात खुशबू नामदेव ठाकरे हीचा मृत्यू झाला होता.त्याबाबत पेण पोलीस ठाण्यात खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूबद्दल आकस्मिक मृत्यूची नोंद २८ जानेवारी रोजी नोंद झाली आहे. त्यानंतर खुशबू हीचा मृत्यू चुकीच्या औषधे दिल्याने झाला असल्याने या प्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली होती.त्यानुसार रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून रायगड जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना खुशबू प्रकरणी अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र डिड महिन्यात या दोन्ही अधिकाऱ्यांचा अहवाल पेण पोलिसांना प्राप्त झालेला नाही आणि त्यामुळे संबंधित दोषी यांच्यावर गुन्ह्याची कार्यवाही होऊ शकली नाही असा दावा सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी केला आहे.जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना अहवाल सादर करण्यासाठी एवढे दिवस लागतात कशासाठी? हा अहवाल लवकर आला तर अशीच चुकीची औषधे अन्य लहान मुलांना देऊन त्यांचे जीव वाचवावे अशी नंदा म्हात्रे यांची मागणी आहे.
पेण तालुक्यातील आदिवासी समाज अत्यंत हलाखीची स्थितीत जगत आहे.त्यामुळे आदिवासी समाजातील लोक मुलांना आश्रमशाळेत पाठवत असतात. मात्र पेन तालुक्यात दोनवेळा आदिवासी समाजाच्या मुलींना आश्रमशाळेत गेल्यावर मृत्यू झाले आहेत. असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आदिवासी समाजात आपल्या मुलांना शासकीय आश्रमशाळेत पाठवण्याबाबत भीती वाटू लागली आहे.त्यामुळे शासनाने खुशबू प्रकरणी शासनाने संबंधितांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक यांच्याकडून खुशबू ला चुकीची औषधं देण्यात आली. त्यामुळे अशा डॉक्टरांवर शासनाने तात्काळ करावी करावी अशी मागणी केली जात आहे.