पाळण्यात बसून ज्येष्ठाचा लोकल प्रवास! राखीव जागा असूनही आसन मिळेना; रेल्वेच्या गर्दीचे भीषण वास्तव चव्हाट्यावर
मुंबई: मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील जीवघेणी गर्दी आता कुठल्या टोकाला पोहोचली आहे, याचे वास्तव विरार- वांद्रे लोकलमध्ये पाहायला मिळाले. वयाच्या उत्तरार्धात सन्मानाने बसून प्रवास करण्याची साधी अपेक्षा असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला आसन न मिळाल्याने दोरी आणि लाकडाची फळी जोडून तयार केलेला ‘पाळणा’ डब्यातील हँडलला बांधून त्यावर बसून प्रवास करावा लागला. हा फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल असून रेल्वेच्या वाढत्या गर्दीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आता आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेवर दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यापैकी पश्चिम रेल्वे मार्गावरच सुमारे ३० लाख प्रवाशांची वाहतूक होते. विरार, नालासोपारा, वसई, भाईंदर आणि बोरीवली परिसरातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा राहत नाही.(फोटो सौजन्य – AI)
Mumbai Rain: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! अंधेरी, सांताक्रुझमध्ये पावसाची दमदार सुरुवात…
विरार-वांद्रे लोकलमधील हा ‘पाळणा प्रवास’ केवळ एका ज्येष्ठ नागरिकाची शक्कल नसून मुंबई लोकलमधील वाढत्या गर्दीचे आणि व्यवस्थेच्या मर्यादांचे बोलके प्रतीक ठरत आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही सन्मानाने आणि सुरक्षितपणे प्रवास करता येत नसेल, तर परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव या घटनेतून होते.प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त फेऱ्या, वातानुकूलित लोकल आणि नवीन रेल्वे मार्गाच्या घोषणा वारंवार केल्या जात असल्या तरी, प्रत्यक्षात गर्दीच्या समस्येतून दिलासा मिळालेला नाही. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार अपेक्षित वेगाने होत नसल्याने लाखो प्रवाशांना दररोज तासन्तास उभे राहून प्रवास करावा लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकाला बसण्यासाठी पाळणा बांधून प्रवास करावा लागतो, यापेक्षा रेल्वे व्यवस्थेचे मोठे अपयश दुसरे असू शकत नाही. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरले असून प्रवाशांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आता केवळ घोषणांची नाही, तर प्रत्यक्ष उपाययोजनांची गरज आहे,अशी भूमिका नंदनकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना यांनी मांडली आहे.
दररोज प्रवासी ७५ लाखांहून अधिक
पश्चिम रेल्वेवरील दैनंदिन प्रवासी सुमारे ३१ लाख
मुंबई उपनगरी रेल्वे फेऱ्या : ३००० हून अधिक
सर्वाधिक गर्दीचे मार्ग विरार-चर्चगेट, कल्याण-सीएसएमटी
गर्दीच्या वेळेत अनेक गाड्यांमध्ये, क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी
‘गिरगावकरांना वीजपुरवठा समस्येबाबत दिलासा मिळेपर्यंत…’; Mangal Prbhat Lodha यांचा इशारा
अशी परिस्थिती कायम राहिल्यास प्रवाशांना आणखी कोणते पर्याय शोधावे लागतील, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जानेवारी २०२६ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेने १२ कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली.मात्र प्रवासीभार सातत्याने वाढत असताना त्यानुसार आसनक्षमता आणि गाड्यांची संख्या वाढलेली नसल्याची खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत. त्यातच साध्या लोकलच्या तुलनेत वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांवर अधिक भर दिला जात असल्याने सामान्य लोकलमधील गर्दी वाढत असल्याची टीका होत आहे.






