पुणे : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम समाजाच्या विकासासाठी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घटकांचा विकास होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथा बंद करण्याच्या ठरावाबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. याविषयी नुकतेच ग्रामविकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रथम लोकांच्यामध्ये जनजागृती होऊन अधिकाधिक प्रमाणात या महिलांचा विकास आणि पुनर्वसन व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, प्रशासन आणि समाजाने एकत्रितरित्या पुढे यावे असे आवाहन आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.
विधान परिषद उपसभापती कार्यालय, स्त्री आधार केंद्र, विधवा महिला सन्मान कायदा अभियान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विधान भवन,पुणे येथे विविध सामाजिक संस्था सोबत परिवर्तन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘महिला आणि त्यांचे सामाजिक प्रश्न यावर काम होणे आवश्यक आहे. समाजाने यासाठी आपली मानसिकता आणि दृष्टिकोन यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. महिलांचे प्रश्न हे प्रांत,जात व धर्माच्या पलीकडले आहेत. विवाह हा संस्कार असून तो समानते वर टिकतो. समाजामध्ये महिलांना दूजाभावाने वागवू नये व विधवांच्या प्रती असणाऱ्या अनिष्ट रूढी व परंपरा यांना नष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी समाजामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. ‘
सामाजिक कार्यकर्ते आणि या अभियानाचे प्रवर्तक प्रमोद झिंजाडे यांनी यामागील भूमिका स्पष्ट केली. स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी यांनी प्रास्ताविक केले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी, ‘पुणे जिल्ह्यामध्ये ग्राम पंचायत हद्दीतील मालमत्ता पत्रकी पुरुषा बरोबर त्याच्या पत्नीचे नाव ही घेण्या बाबत जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याचे सांगितले. तसेच ८८% घर पत्रकावर दोघांची ही नावे आहेत.’
यावेळी उपस्थित महिलांच्या मध्ये दोन गटचर्चा घेण्यात आल्या. यामध्ये अनेक महिलांनी स्वतःचे अनुभव कथन करून ह्या प्रथेचा झालेला झालेला त्रास सांगितला व समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ग्रामीण स्तरावर उपाय योजना गरजेची असल्याचे मांडले. समाजामध्ये असलेला विधवेप्रती असणारा दृष्टिकोन, त्यांना येणारे विविध विचित्र अनुभव आणि या विषयात भविष्यात करावयाच्या कामाचे नियोजन याविषयी चर्चा झाली. स्त्री आधार केंद्राच्या सुनीता मोरे, विजया शिंदे, अनिता शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
[read_also content=”एखाद्या निष्पापाला अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्याना शिक्षा झाली पाहिजे : दिलीप वळसे पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/those-who-try-to-trap-an-innocent-person-should-be-punished-dilip-walse-patil-nrdm-285836.html”]
पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी, स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे, विभावरी कांबळे, रमेश शेलार, गौतम गालफाडे, लहानु अबनावे, अनिता परदेशी,आश्लेषा खंडागळे, वैशाली घोरपडे,नंदिनी जाधव,अनुराधा सहस्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीला अहमदनगर, सातारा, सांगली, लातूर, सोलापूर, मुंबई, नवी मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणांवरून सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.