सौजन्य - सोशल मिडीया
पंढरपूर : एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी पंढरपुरात आले होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे प्रणव परिचारक, माऊली हळणवर, सुभाष मस्के, तमीम सय्यद, अक्षय वाडेकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता खांडेकर, प्रभारी तहसीलदार
सचिन मुळीक, कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड उपस्थित होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले, दोन पवार एकत्र यावे अथवा न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. कोणी यासाठी काय साकडे घालावे त्यांची इच्छा आहे. याबाबत व्यक्तीशा टिपणी करणे उचित राहणार नाही.
खाते वाटपावरून कोणतीही नाराजी नाही
मंत्री मंडळात खाते वाटप झाल्यावरून कोणतीही नाराजी नाही. जलसंपदा खाते विभागून दिल्याने नाराजी नाही. या खात्यात खूप काम करण्यासारखे आहे. नदी जोड प्रकल्प, तुटीचे गोदावरी खोरे यात काम करण्यास वाव आहे. महापालिका जिल्हा परिषद निवडणूक महायुती एकत्रपणे लढणार असून आधी दिलेले १० टक्के आरक्षण कायम आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे. लगेच उपोषणाला बसू नये, असे मत विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
हे सुद्धा वाचा : पुण्यात ठाकरे गटात वाद; माजी नगरसेवकांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर फाेडले खापर
बीड प्रकरणावर धनंजय मुंडे काय म्हणाले?
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना वाल्मिक कराड प्रकरण आणि बीड पोलीस स्टेशनबाहेरील पाच खाटांवरुन सुरू असलेल्या वादातून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. या प्रकरणात दबाव येऊ नये म्हणून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना मुंडेंनी आपली भूमिका मांडली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी व्यवस्थितपणे तपास करीत आहे. त्यांची हत्या करणाऱ्यांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि दोषीला फासावर लटकवणं माझ्यासाठी आवश्यक असल्याचं मुंडे म्हणाले. या प्रकरणात फास्ट ट्रॅकमध्ये जायला हवं याची मागणी सर्वात आधी मी नागपूरच्या अधिवेशनात केली होती, असंही ते म्हणाले.
मी राजीनामा का द्यावा, कारण काय? मी कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही. कोणत्याही घटनेशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही. हा तपास सीआयडीकडे दिला आहे. न्यायालयातही तपास होणार आहे. त्यामुळे मी मंत्री म्हणून या प्रकरणावर कुठलाही दबाव होऊ शकत नाही, असंही धनंजय मुंडे यांनी सांगत या राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं.