Rohit Pawar on Nagpur Event:'पुण्यात उत्स्फूर्त गर्दी, नागपुरात आणलेले लोक!; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका
पुण्यातील राहुल गांधींचा कार्यक्रम उत्स्फूर्त, तर नागपुरातील मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम ‘आणलेल्या गर्दीचा’
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ ला मिळालेला प्रतिसाद पाहून भाजपने नागपुरात घाईघाईत कार्यक्रम घेतला
नागपुरातील ‘जेन-झी’ संवादात केवळ ठरवलेले प्रश्न विचारले गेल्याचा आरोप
Rohit Pawar Press Conference: “पुण्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम पार पडला. तर दुसरीकडे नागपुरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील झेन-झी सोबत संवाद साधला. स्वतःहून आलेले लोक आणि आणलेले लोक हे जर तुम्हाला पाहायचे असतील, तर राहुल गांधी यांचा कार्यक्रम हा स्वतःहून आलेल्या लोकांचा कार्यक्रम होता.नागपुरातील कार्यक्रम हा आणलेल्या लोकांचा कार्यक्रम होता.” अशा खोचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांना सामान्य लोकांनी प्रश्न विचारले असते तर काय झाले असते? गेल्या तीन महिन्यांत नागपूर शहरात ३२ खून झाले आहेत. तुम्ही गृहमंत्री आहात, काय करत आहात?’असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला. ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली. क्रिकेटपटू तिलक वर्मादेखील तिथे आला होता. गर्दी आणण्यासाठी सेलिब्रिटीला आणले होते की नाही, हे त्यांनाच माहीत. अशा प्रकारे संवाद होत नाही. संवाद लोकांमध्ये जाऊन होतो. आम्हाला तुमच्या मन की बात नको, आम्हाला जन की, म्हणजेच लोकांची गोष्ट ऐकायची आहे.” असा टोलाही रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला.
“जी लहान मुले होती, त्यांना संधी द्यायला पाहिजे होती. ४ हजार ढोलवादक तिथे आले होते, त्यावर आमचा आक्षेप नाही. मात्र वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन मुलांना बोलावण्यात आले. ही मुले बक्षिसे घेण्यासाठी किंवा तिलक वर्माला पाहण्यासाठी आली असतील. त्यात तुम्ही जेन-झी संवाद ठेवला. मग कार्यक्रमात कार्यक्रम कशासाठी घेतला? राहुल गांधींचा कार्यक्रम पाहून भाजपदेखील काँग्रेसची कॉपी करत आहे,” असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.
अमरावतीतील रुग्णालयात झालेल्या व्हेंटिलेटर स्फोटाची घटना अतिशय दु:खद आहे. आगीत तीन लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. या हॉस्पिटलचे फायर ऑडिट होणे महत्त्वाचे आहे; मात्र केवळ ऑडिट केल्याचे दाखवले जाते, पुढे त्यावर काहीही कारवाई होत नाही. यात श्रीमंतांची मुले मृत्युमुखी पडत नाहीत, तर गरिबांची मुले मृत्युमुखी पडतात. गेल्या वर्षभरात पाच वर्षांखालील ४४ मुले मृत्युमुखी पडली आहेत. अशी प्रतिक्रीया रोहित पवार यांनी दिली.
रोहित पवार यांनी यावेळी बोलताना अनेक घटनांवर भाष्य करत सरकारवर टिकेची झोड उठवली. “अंगणवाड्यांची परिस्थिती एवढी वाईट का आहे? आदिवासी बालकांना जे दूध दिले जायचे, त्याचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या गप्पा कमी करून या बालकांच्या मृत्यूकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. कुपोषणापासून सर्पदंशापर्यंत वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत ४४ बालकांचा मृत्यू झाला आहे. एखाद्या वेळी ऑडिट केल्याचे दाखवले जाते, एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित केले जाते; मात्र कंत्राटदारावर कधीच कारवाई केली जात नाही. एखादी व्यक्ती जबाबदार असेल तर तिला निलंबित कशाला करता? तिला थेट घरी पाठवले पाहिजे.”
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी, ‘आम्ही एकत्र जाणार नाही.’ हे आधीच स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांच्याबद्दल काँग्रेसमधून कोणीही बोललेले नाही. विषय एवढाच आहे की, जेव्हा महाराष्ट्रात – मुख्यमंत्र्यांच्या विभागात आमचे काम असते, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मी सर्वाधिक बोलतो. मात्र, त्यांच्याकडे पद आहे, सत्ता आहे. सामान्य लोकांसाठी आम्हीही मुख्यमंत्र्यांकडे जातो. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे पंतप्रधानांना भेटल्या. म्हणून आम्ही एनडीएसोबत चाललो आहोत, असे होत नाही.






