Akola News : रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; दर्यापूर मार्ग झाला ठप्प (संग्रहित फोटो)
अकोला : न्यू तापडियानगर येथील रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. पुलाचे प्रत्यक्ष काम वेगाने सुरू होईपर्यंत पूर्ववत हे रेल्वे गेट ऑटोरिक्षा व चारचाकी वाहनांसाठी तातडीने खुले करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. नरेंद्र बेलसरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेऊन संबंधित प्रशासनाशी समन्वय साधत तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
न्यू तापडियानगर व दर्यापूर मार्गावरून अकोला शहरात प्रवेश करण्यासाठी हा सर्वाधिक महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, रामतीर्थ, करतखेड, म्हैसांग, आपातापा, घुसर, आपोती, गोरेगाव, खरप, लखपुरी आदी गावांतील हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार दररोज शहरात ये-जा करतात. मात्र, सध्या या मार्गावरून तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याने वाहनधारकांना अकोट फाईल पुलावरून मोठा वळसा घालून शहरात यावे लागत आहे. यामुळे अकोट फाईल पुलावर वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाला असून, दररोज सकाळी ११ वाजेच्या सुमारास तसेच सायंकाळी ५ वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांच्या जीविताला धोका
रेल्वे गेट बंद असल्यामुळे अकोट फाईल पुलावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सकाळी व सायंकाळी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकाही अडकून पडत आहेत. त्यामुळे उपचारासाठी होणारा विलंब गंभीर रुग्णांसाठी धोकादायक ठरत असून, अनेकदा नातेवाईकांचीही मोठी धावपळ उडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
अर्धा तास राहावे लागते ताटकळत
या कोंडीत वाहनधारकांना अनेकदा अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागत असून, इंधनाचा अपव्यय आणि वेळेचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात रेल्वे गेट बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना भर पावसात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकादेखील या कोंडीत अडकत असल्याने गंभीर रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.
रेल्वे गेट मर्यादित स्वरूपात वाहतुकीसाठी खुले करावे
अनेकदा वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये वादावादी होत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. नागरिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील, मात्र तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे गेट मर्यादित स्वरूपात तरी वाहतुकीसाठी खुले करावे.






