(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
होम्बले फिल्म्सने भारतीय चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र आणि भव्य ओळख निर्माण केली आहे. KGF: चॅप्टर 1, KGF: चॅप्टर 2, कांतारा, कांतारा चॅप्टर 1, सालार आणि महावतार नरसिंह यांसारख्या गाजलेल्या ब्लॉकबस्टर चित्रपटांद्वारे कंपनीने केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवले नाही, तर भारतीय सिनेमाचा दर्जा जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले आहे. आता या यशस्वी प्रवासात आणखी एक महत्त्वाचा अध्याय जोडला जात आहे. ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशन क्षेत्रात अधिकृतपणे प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.
हा निर्णय केवळ व्यवसायवृद्धीचा भाग नसून एक दूरदृष्टीपूर्ण धोरणात्मक पाऊल मानला जात आहे. आज भारतीय सिनेमा केवळ देशापुरता मर्यादित राहिलेला नाही; जगभरातील प्रेक्षक भारतीय कथा, संस्कृती आणि भावनांशी जोडले जात आहेत. अशा वेळी परदेशातील वितरण यंत्रणा स्वतःच्या हातात घेण्याचा निर्णय म्हणजे जागतिक पातळीवर अधिक मजबूत उपस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
हॉम्बले फिल्म्सने आतापर्यंत भव्यता, दमदार कथानक आणि उच्च निर्मितीमूल्यांचा ठसा उमटवला आहे. ‘केजीएफ’ चित्रपटाने ॲक्शन चित्रपटांना नवा आकार दिला, तर ‘कांतारा’ने लोककथा, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम घडवत प्रादेशिक सिनेमालाही जागतिक व्यासपीठावर पोहोचवले. ‘सालार’सारख्या चित्रपटांनी पॅन-इंडिया संकल्पनेला अधिक बळ दिले. या सर्व अनुभवांच्या जोरावर आता कंपनी परदेशात अधिक संघटित आणि केंद्रित वितरण जाळे उभारण्याच्या तयारीत आहे.
विशेष म्हणजे, हा पुढाकार केवळ त्यांच्या स्वतःच्या निर्मितीपुरती मर्यादित राहणार नाही. देशभरातील विविध प्रोडक्शन हाऊसेस आणि निर्मात्यांसोबत सहकार्य करत भारतातील वेगवेगळ्या भाषा, प्रांत आणि संस्कृतींमधील कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचे ध्येय आहे. यामुळे प्रादेशिक चित्रपटांनाही परदेशात अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात.
होळी पौर्णिमेला ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये रंगणार थरारक पर्व; स्वामींच्या हस्तक्षेपाने उघड होणार सत्य
ओव्हरसीज डिस्ट्रीब्युशन क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे प्रदर्शनाची वेळ, मार्केटिंग धोरणे, थिएटर नेटवर्क आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सशी समन्वय यावर अधिक नियंत्रण मिळणार आहे. परिणामी, चित्रपटांचा जागतिक प्रभाव वाढवण्यास मदत होणार आहे. भारतीय सिनेमाची ताकद केवळ कथांमध्ये नाही, तर त्या सादर करण्याच्या पद्धतीतही आहे. आणि हाच विश्वास घेऊन हॉम्बले फिल्म्स पुढे वाटचाल करत आहे. एकूणच, हा निर्णय भारतीय चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. भारतातील कथा, परंपरा आणि कल्पनाशक्ती आता अधिक व्यापक पातळीवर झेप घेण्यास सज्ज झाली आहे. हॉम्बले फिल्म्सचा हा विस्तार केवळ कंपनीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय सिनेमासाठी नवी दारे उघडणारा ठरणार आहे.






