सोनम वांगचुक यांच्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर (Photo Credit- X)
देशभरातल्या तरुणांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचुक जी आणि अभिजीत दिपके व तमाम युवकांना पाठिंबा देण्यासाठी, निष्ठूर भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी, चला एकत्र येऊया! १९ जुलै, रविवारी, शिवतीर्थावर, मॉंसाहेब मिनाताई ठाकरे ह्यांच्या पुतळ्याजवळ ४ वाजता भेटूया! हा लढा सर्वांचा… pic.twitter.com/4MQJ36ktQY — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2026
या ऐतिहासिक लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी १९ जुलै (रविवार) रोजी दुपारी ४:०० वाजता शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येण्याचे खुले आवाहन केले आहे. “हा लढा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, देशातील लाखो तरुणांच्या भविष्याचा आहे,” असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले, “ज्या मुद्द्यासाठी सोनम वांगचुक दिल्लीत गेल्या १९ दिवसांपासून अन्नपाण्याविना उपोषण करत आहेत, त्याकडे भाजप सरकार ज्या असंवेदनशीलतेने पाहत आहे, त्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते: या सरकारला तरुण भारताच्या भविष्याची आणि त्यांच्या स्वप्नांची अजिबात काळजी नाही.”
दिल्ली मध्ये @Wangchuk66 जी ज्या कारणासाठी उपोषण करत आहेत, त्या प्रश्नाविषयी भाजप सरकारची असंवेदनशीलता एकच गोष्ट सिद्ध करते की, या सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही. त्यांची अत्यंत साधी मागणी आहे, पेपरफुटीप्रकरणी अपयशी ठरलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांना… — Aaditya Thackeray (@AUThackeray) July 16, 2026
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थेट जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी करत ठाकरे म्हणाले, “वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेश परीक्षेतील पेपरफुटीसारख्या गंभीर आणि कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या घटनेनंतरही, असा अकार्यक्षम केंद्रीय मंत्री जगातल्या कोणत्याही लोकशाही देशात पदावर राहिला नसता. पण इथे त्यांना अजूनही पदावरून हटवले गेलेले नाही.”
नीट पेपरफुटीप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह बाधित विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक मदत मिळावी, या मागण्यांसाठी अभिजित दिपके यांनी दिल्लीत २५ दिवसांपूर्वी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला सोनम वांगचुक यांनी पाठिंबा देत थेट आमरण उपोषण सुरू केले आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला होता, तर आता आदित्य ठाकरे स्वतः कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून जनआंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. भाजपच्या सत्तेच्या राजकारणावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे शेवटी म्हणाले, “पेपरफुटीचा प्रश्न असो, इथेनॉलचे धोरण असो किंवा मंदिरांचे वाद असोत… भाजपचे एकच धोरण राहिले आहे; ते म्हणजे लोकांमध्ये फूट पाडणे आणि कोणत्याही मार्गाने स्वतःची सत्ता टिकवणे. मात्र, आता देशातील तरुण गप्प बसणार नाहीत.”






