धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजन यांची शेतकऱ्यांवर चिडचिड झाली (फोटो - सोशल मीडिया)
Girish Mahajan : धाराशिव : महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे जमीन पूर्णपणे वाहून गेली. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक गेल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र योग्य वेळी मदत मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त करत आहे. दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी देखील जागेवर मदत मागणाऱ्या शेतकऱ्यांवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केली. भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात शेतकऱ्यांचे शेकडो जनावरं वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडून धरला. गिरीश महाजन आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला. जनावर मेली आहेत तात्काळ मदत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी मी प्रशासनाला सांगून मदत करायला लावतो, मी पैसे घेऊन आलो नाही असे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. मंत्र गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांबाबत असंवेदनशीलता दाखवल्यामुळे विरोधकांनी टीकास्त्र डागले. शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून गिरीश महाजन यांनी पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे निघाले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी मंत्री बच्चू कडू तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाले की, तुम्ही जसे भाजप सरकारचे संकट मोचक झालात तसं शेतकऱ्याचं का होत येत नाही, असा सवाल कडू यांनी चंद्रपूर येथे माध्यमांशी बोलताना विचारला. किमान चांगलं बोलता येत नसेल तर जाऊ नका ना.. कोणी आग्रह केला, असा सवाल त्यांनी केला. देत तर काहीच नाही उलटून अशी भाषा करत असेल तर निषेध करतो असे, अशी तीव्र प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंत्री गिरीश महाजन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर आमदार रोहित पवार हे धाराशिवमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्याची भेट घेतलीय. याबाबत एक्सवर माहिती देत रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “धाराशीव, येथील विश्वनाथ दातखिळे यांच्या तब्बल ३५ गाई दगावल्या. त्यापैकी काही गाई तर वाहून गेल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. काल मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी याठिकाणी भेट देण्याचं टाळलं तरी रात्री उशीरा विश्वनाथ दातखिळे यांच्या घरी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि त्यांना धीर दिला. सर्वस्व वाहून जाणं म्हणजे काय याचं अत्यंत विदारक आणि विषण्ण चित्र याठिकाणी बघायला मिळालं. सरकारला पंचनामे करताना नियमांवर बोट न ठेवता संवेदनशीलपणा दाखवून काम करण्याची आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी लागेल,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.