'समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्री करा, मग राज्यसभेत जाणार,' छगन भुजबळांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने रिक्त झालेल्या जागेवरील आपला दावा मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेतृत्व पूर्णपणे सक्रिय झाले आहे. महायुतीमध्ये छगन भुजबळ यांच्या नावावर एकमत होताना दिसत आहे. या राजकीय वाटाघाटींच्या दरम्यान, छगन भुजबळ यांनी पक्ष आणि सरकारसमोर आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जात असतानाच भुजबळ यांनी मोठी मागणी करत पुतणे समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे.
छगन भुजबळ यांनी शनिवारी (६ जून) पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी करत ‘मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ याना मंत्रिमंडळात घ्यावे,’ अशी मागणी केली. भुजबळांसह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही फडणवीसांकडे तसा आग्रह केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. मात्र अजूनदेखील भाजपकडून याबाबत होकार मिळाला नसल्याचे समजत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयाची वाट बघत बसले आहेत. भाजप हायकमांडकडून भुजबळांच्या मागणीला ग्रीन सिग्नल मिळाल्यास भुजबळ सोमवारी आपला राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करतील, अशीही माहिती मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, भाजपचे वरिष्ठ नेतृत्व नवनीत राणा यांना राज्यसभेत पाठवून महायुतीमध्ये एक नवीन समीकरण तयार करू इच्छिते. ही जागा मूळची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्याने, ती दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला दिली जाणार या बातमीने अजित पवार गटात असंतोषाची लाट उसळली. हे नुकसान नियंत्रणात आणण्यासाठी शनिवारी सकाळी बैठकांची मालिका सुरू झाली आणि अखेरीस, पक्षाचे सर्व प्रमुख नेते भुजबळ यांच्या निवासस्थानी त्यांचे नाव निश्चित करण्यासाठी गेले.
आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शनिवारी संध्याकाळपर्यंत छगन भुजबळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतो की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय लक्ष लागले आहे. याशिवाय, महायुतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्व छगन भुजबळ यांच्या आग्रहापुढे झुकून समीर भुजबळ यांचा राज्याच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात समावेश करून त्यांना मंत्री म्हणून शपथ देतील की नाही, हे पाहणे अत्यंत रंजक आणि आव्हानात्मक असेल. जर हे सूत्र पूर्णपणे यशस्वी झाले, तर आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी ओबीसी राजकीय पटलावर महायुतीला मोठे बळ मिळू शकते.
Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीत आघाडीत दिसून आली बिघाडी; पण युती मात्र सुसाट…






