Chandrapur News: तीन दिवसांच्या पावसाने चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना दिलासा; धान रोवणीच्या कामांना वेग, मात्र मजुरांचा तुटवडा
यंदा पावसाने सुरुवातीला दडी मारल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते. काही ठिकाणी रोपवाटिका सुकण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे दुबार पेरणी किंवा रोपे पुन्हा तयार करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र गेल्या तीन दिवसातील पावसामुळे ही चिंता दूर झाली असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. चंद्रपूर, ब्रहापुरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, मूल, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा आणि सावली तालुक्यांतील शेतांमध्ये शेतकरी व शेतमजूर सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोवणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक ठिकाणी महिलांचा मोठा सहभाग असून, शेतांमध्ये पारंपरिक पद्धतीने धान रोपांची लागवड सुरू झाली आहे. पुढील काही दिवस पावसाची साथ कायम राहिल्यास जिल्ह्यातील धान लागवड मोठ्या प्रमाणात पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धान रोवणीच्या कामाला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी एकाच वेळी रोवणीला सुरुवात केल्याने शेतमजुरांची मागणी अचानक वाढली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये रोवणीसाठी मजूर उपलब्ध होत नसून, शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही ठिकाणी मजुरीचे दरही वाढले असून, मजुरांच्या कमतरतेमुळे रोवणीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
जिल्ह्यात जून महिन्यापासून ४४८.५ मिमी एवढा सरासरी पाऊस पडला. मात्र यावर्षी २९२.८ मिमी पाऊस पडला. जे सरासरीच्या केवळ ६५.३ टक्के एवढा आहे. तर मागील तीन दिवसामध्ये सरासरी ८४.२ मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे रोवणीला वेग आलेला आहे. सोमवारी २१.६ मिमी, मंगळवारी ४३.५, तर बुधवारी १९.६ मिमी एवढा पाऊस पडला. दरम्यान गुरूवारी पावसाने उसंत दिली.






