खासदार संजय राऊत यांनी बारामती अपघात प्रकरणावरुन तपास यंत्रणेवर रोष व्यक्त केला (फोटो - सोशल मीडिया)
यंत्रणांवर जनतेचा विश्वास राहिला नाही
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, “राज्यातील आणि देशातील तपास यंत्रणा या भाडXXX झाल्या आहेत. तपास यंत्रणा लाचार, गुलाम झाल्या आहेत. ईडी असेल, सीबीआय असेल, राज्यातील पोलीस यंत्रणा असेल, आयबी असेल अशा अनेक तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल, यावर आता लोकांचा, जनतेचा विश्वास राहिला नाही,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. मात्र त्यांनी तपास यंत्रणा आणि पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप
पुढे ते म्हणाले की, “जे सरकार आपल्या स्वार्थासाठी आणि चामडी वाचवण्यासाठी भारत माता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाशी ठेवू शकते, ते सरकार काहीही करू शकते. मोदी सत्तेत आल्यापासून कोणत्याही घटनेचा, अपघाताचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही. उलट हा तपास पक्षपातीच झाला,” असा मोठा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
हे देखील वाचा : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…
मिस्टर फडणवीस इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “घात, अपघात, इतर अनेक प्रसंगांमध्ये तपास यंत्रणांनी काम केले नाही. देवेद्र फडणवीस जे म्हणत आहेत की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, तर नाही. तुमच्या सरकारवर विश्वास नाही तर तपास यंत्रणांवर विश्वास नाही. अहमदाबादच्या विमान अपघाताचं काय झालं? अहमदाबादमध्ये विमान कसं पडलं हे सांगू शकाल? अजितदादांना घेऊन येणारं विमान सुद्धा गुजरातमधूनच आलं. लोकांच्या मनात संशय येणारच. तुम्ही तापस यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. न्यायालयापासून ते सर्व तपास यंत्रणा या तुमच्या टाचेखाली आहेत, हे अख्ख्या जगाला आणि देशाला माहिती आहे. मिस्टर फडणवीस इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो,” अशा शब्दांत खासदार राऊतांनी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.






