गॅस दरवाढीवरून भाजपचा रोहित पवारांवर पलटवार,
गेल्या काही दिवसांपासून अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभारत इंधन तुटवडा आणि दरवाढ करण्यात आली होती. त्यातच आता महागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक फटका बसला आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG ) सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर आज ७ जूनपासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर, दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत ₹९१३ वरून ₹९४२ होणार आहे. यावरून आता राजकीय नेत्यांकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून केंद्र सरकारला चांगलेच फैलावर घेतले. मात्र, आता भाजपनेसुद्धा यावर पलटवार केला असून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी “शरद पवार कृषिमंत्री असताना हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यावेळी हेच अश्रू कुठे गेले होते?” असा सवाल उपस्थित केला आहे.
अमेरिका – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभारत इंधन तुटवडा आणि दरवाढ करण्यात आली होती. आता याचा फटका घरगुती LPG सिलेंडरवरदेखील पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही LPG गॅसवरील दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी प्रति सिलेंडर ६० रुपयांची दरवाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दरवाढ केली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. नवनाथ बन यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट करत रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
नवनाथ बन म्हणाले, “महागाईची चिंता आज रोहित पवार यांना वाटत असेल तर शरद पवार कृषिमंत्री असताना हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यावेळी हेच अश्रू कुठे गेले होते? महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असताना आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना तुमचे नेते सत्तेच्या खुर्च्या सांभाळण्यात व्यस्त होते.”
“महागाई हा जागतिक विषय आहे. युद्ध, आंतरराष्ट्रीय इंधन बाजारातील चढउतार आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम अनेक देशांवर झाला. मात्र भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या खंबीर नेतृत्वात या संकटातही जगातील अनेक देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आणि सर्वसामान्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आधार दिला.”
महागाईची चिंता आज रोहित पवार यांना वाटत असेल तर शरद पवार कृषिमंत्री असताना हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यावेळी हेच अश्रू कुठे गेले होते? महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असताना आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना तुमचे नेते सत्तेच्या खुर्च्या सांभाळण्यात व्यस्त होते. महागाई… https://t.co/cC2Qwr1cel — Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) June 7, 2026
“रोहित पवार यांनी “विशिष्ट उद्योगपतींसाठी सरकार काम करते” असं म्हणण्यापूर्वी आपल्या पक्षाच्या सत्ताकाळातील उद्योगपतींशी असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकावा. ‘उद्योगपतींच्या ड्राव्हिंग सीट’वर बसून त्यांना पाडघड्या कुणी घातल्या होत्या हे एकदा आठवावं. अन्यथा आपल्यालाच ‘शॉर्ट-टर्म मेमरी लॉस’ झालाय हे मान्य करावं.”
“देशातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा, महामार्ग, वंदे भारत, मेट्रो, विमानतळ, डिजिटल व्यवहार आणि शेतकरी कल्याण योजनांमुळे फायदा सामान्य नागरिकांनाच झाला आहे. महागाईच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहित पवारांनी आधी आपल्या पक्षाच्या अपयशाचा हिशोब द्यावा. जनतेला उपदेश करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करणं त्यांच्यासाठी अधिक आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते यावेळी म्हणाले, “पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करुन महागाईचा भडका केल्यानंतर आता सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरातही २९ रुपये वाढ करुन सामान्य माणसाच्या ताटातील जेवणही महागाईच्या आगीत करपून टाकलं. बेरोजगारी वाढत आहे, शेतमालाला भाव नाही आणि देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढणारी महागाई मात्र दिसत नाही, हे दुर्दैव आहे. सामान्य माणसाच्या जीवावर उठलेलं हे निर्दयी आणि निष्ठूर सरकार असून महागाईच्या भडक्यात भाजून निघालेल्या जनतेची जेंव्हा माथी भडकतील तेंव्हा या सरकारलाही पोळल्याशिवाय राहणार नाही.”
पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करुन महागाईचा भडका केल्यानंतर आता सरकारने घरगुती सिलिंडरच्या दरातही २९ रुपये वाढ करुन सामान्य माणसाच्या ताटातील जेवणही महागाईच्या आगीत करपून टाकलं. बेरोजगारी वाढत आहे, शेतमालाला भाव नाही आणि देशातील प्रादेशिक पक्ष फोडण्यात व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट… pic.twitter.com/uUfH2hoTyC — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 7, 2026
“विशिष्ट उद्योजक-व्यावसायिकांसाठी काम करणाऱ्या या सरकारला गॅस दरातील वाढीमुळं काहीही फरक पडत नसला तरी सामान्य माणसाचं जगणं मात्र कठीण होतंय याची जराही जाणीव नाही. निवडणुकीत ‘बहुत हुयी महागाई की मार’ अशा जाहिरातींचा मारा करुन सत्तेत आलेलं हे सरकार आता ‘शॉर्ट-टर्म मेमरी लॉस’चं शिकार झालंय की मुळातच हे विश्वासघातकी सरकार आहे, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.






