देशभरात मुसळधार पावसाचा हाहा:कार; जम्मूमध्ये भूस्खलनामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम, आसाममध्ये तर...
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक भागांत मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाने देशभरात हाहा:कार उडाला आहे. आसाममध्ये महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, गेल्या 24 तासांत आणखी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसात एक ट्रक नाल्यात घसरल्याने वडील आणि मुलाचा मृत्यू झाला.
जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे डोंगरावरून एक मोठा दगड कोसळल्याने एका जोडप्याचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गांसह अनेक रस्ते बंद झाले आहेत. वैष्णो देवी आणि केदारनाथ यात्राही थांबवण्यात आल्या आहेत. आसाममधील पूरस्थिती गंभीर आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना पूर आला आहे. राज्यात आलेल्या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत शिवसागरमध्ये १३, चराईदेवमध्ये पाच, गोलाघाटमध्ये दोन आणि जोरहाटमध्ये एका मृत्यूचा समावेश आहे.
राज्यातील १६ जिल्ह्यांमधील ५.६४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ८७२ गावे पाण्याखाली गेली असून, २४००० हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि लष्कर तैनात करण्यात आले आहे.
आसाममध्ये ६० वर्षांत पहिल्यांदाच असा पूर
राज्याचे संसदीय कामकाज मंत्री पीयूष हजारिका यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले की, पुरामुळे राज्यात प्रचंड विध्वंस झाला असून लाखो लोक प्रभावित होत आहेत.
सिक्कीममधील बोगद्यातून आतापर्यंत 15 मृतदेह बाहेर
सिक्कीममध्ये बांधकाम सुरू असलेल्या तीस्ता फेज-६ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेनंतर, बुधवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पंधरा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बोगद्यात आणखी पाच मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथके ते बाहेर काढण्याचे काम करत आहेत.
मुसोरी-देहरादून रस्ता रात्री पुन्हा बंद
उत्तराखंडमध्ये दिवसा झालेल्या मुसळधार पावसामुळे खराब झालेला मुसोरी-देहरादून मुख्य रस्ता पुन्हा सुरू केल्यानंतर, रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत केवळ अत्यावश्यक वाहनांनाच रस्त्यावर ये-जा करण्याची परवानगी आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडजवळ दरड कोसळल्याने केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे.






