Operation Tiger: 'सर्वच आमदार-खासदार संपर्कात'; बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?
संजय शिरसाट यांनी वर्धा येथे बोलताना राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबवले जाणार असल्याचे भाष्य केलं. आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. येत्या एका महिन्यात ऑपरेशन टायगरचा प्रत्यय तुम्हाला दिसेल, अस शिरसाट यांनी म्हटलं आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक झाल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यातच आता शिरसट यांच्या वक्तव्याने आणखी बळ मिळाल्याचे दिसत आहे.
येत्या महिन्यातच तुम्हाला ऑपरेशन टायगरचा प्रत्यय येईल. उद्धव ठाकरे यांचे सर्व खासदार काय सर्व आमदारही पहिल्यापासून आमच्या संपर्कात आहेत. निवडणूक झाली तेव्हापासून सर्वजण संपर्कात आहेत. पण ऑपरेशन टायगर केव्हा आणि कसं करायचं, याचा निर्णय हे एकनाथ शिंदेसाहेब योग्य वेळेला घेतील, असे शिरसाट म्हणाले.
“उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, कोणाशी बोलत नाहीत किंवा कोणाच्या अडचणी समजून घेत नाहीत; याच कारणामुळे आम्ही उठाव केला होता,” असे सांगत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, “सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे जे काही आमदार-खासदार उरले आहेत, त्यांच्यातही तिथे राहण्याची मानसिकता उरलेली नाही. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आपले आणि जवळचे वाटतात. येत्या एका महिन्यात तुम्हाला ‘ऑपरेशन टायगर’चा प्रत्यय येईल,” असा सूचक इशाराही शिरसाट यांनी यावेळी दिला.
दुसरीकडे संजय शिरसाट यांच्या दाव्याचा समाचार घेताना खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली. “मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच राहणार. मला उभा चिरला तरी माझी निष्ठा बदलणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला विश्वास व्यक्त केला. शिरसाट यांनी बैठकीचे जे दावे केले आहेत, त्याबाबत “जर बैठक झाली असेल तर त्याचे फोटो प्रसारित करावेत,” असे थेट आव्हानही सावंतांनी दिले.
“शिवसेनेशी प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करण्यासारखे आहे. उद्धव ठाकरेंच्या एका फोनवर मी केंद्रीय मंत्रीपदही सोडले होते,” याची आठवण करून देत, चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही अरविंद सावंत यांनी यावेळी दिला.






