मोठी बातमी ! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला; बंद दालनाआड नेमकी काय चर्चा?
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा महत्त्वाची घडामोड घडली आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठक सुरू असतानाच विधान भवनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ बंद दालनात चर्चा झाल्यानंतर शिंदे पुन्हा कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झाले. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
बुधवारी विधान भवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळासाठी बैठक सोडून शरद पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. मात्र या चर्चेचा नेमका विषय अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. या अनपेक्षित भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
माहितीनुसार, शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर, रोहित पाटील आणि अभिजीत पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार उपस्थित होते. बैठकीत आगामी राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
अमित शाह-देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बंद दाराआड बैठक; महाराष्ट्राच्या राजकारणावरून मोठी खलबतं?
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे गटात प्रवेश करत उपसभापतीपदाची जबाबदारी स्वीकारली.
या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षाबाबतही विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही नेत्यांच्या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत.
दरम्यान, शरद पवार गटाकडून एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत किंवा सत्ताधारी पक्षांसोबत कोणत्याही राजकीय निर्णयाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या भेटीचा अजेंडा किंवा चर्चेचा विषयही अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या भेटीमागील नेमके कारण काय, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






