West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का; 'या' खासदाराने सोडली ममतांची साथ
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची साथ सोडून तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रकाश चिक बराइक यांनी गुरुवारी पक्ष तसेच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला दिलेल्या जनादेशाच्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांच्यानंतर या आठवड्यात पक्ष सोडणारे बराइक हे तिसरे तृणमूल खासदार आहेत. सूत्रांनुसार, बराइक यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. नंतर, भाजपचे नेते निशिकांत दुबे यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना बराईक म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. तृणमूल काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. पश्चिम बंगालच्या जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करत मी पक्षाचा राजीनामा देत आहे. आपल्या राजीनामा पत्रात, बराइक यांनी लिहिले, मी राज्यसभेचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारावा.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधून नेत्यांच्या मोठ्या संख्येने होणाऱ्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा आला आहे. सोमवारी, राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांनी वरिष्ठ सभागृहाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद असल्याचे सांगून तृणमूल काँग्रेस सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला.
खासदारांकडून दिला जात आहे राजीनामा
बुधवारी, राज्यसभा सदस्य सुष्मिता देव यांनीही संसद आणि पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी दिल्लीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय योजनांबद्दलच्या अटकळांना उधाण आले आहे.
शत्रुघ्न सिन्हा ममतादीदींसोबत
तृणमूल काँग्रेसमधून (TMC) होणाऱ्या नेत्यांच्या गळतीदरम्यान, खासदार शत्रुघ्न सिन्हा हे देखील बंडखोरी करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. ते पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती, मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतःच स्पष्ट केले आहे की ते तृणमूल काँग्रेस सोडणार नाहीत.






