'सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर केंद्राची बघ्याची भूमिका'; अटकेवर शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
बारामती, प्रतिनिधी: सोनम वांगचुक यांनी केलेल्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेतली. वास्तविक पाहता केंद्र सरकारला हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळता आला नाही. वांगचुक यांना करण्यात आलेली अटक दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार आज (दि. १८) बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोविंदबाग येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.
पवार म्हणाले, “सोनम वांगचुक यांना अटक होईल, अशी शक्यता आम्हाला गेल्या पाच-सहा दिवसांपासून वाटत होती आणि अखेर तसेच झाले. वांगचुक यांची मागणी नेमकी काय होती? मंत्र्यांच्या राजीनाम्याची? या संपूर्ण चळवळीतील परिस्थिती सरकारने अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. त्याचा परिणाम हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर झाला.”
“वांगचुक यांनी काही मागण्या केल्या होत्या; मात्र केंद्र सरकारने त्याकडे बघ्याची भूमिका घेतली. हा प्रश्न केवळ एका मागणीपुरता मर्यादित नव्हता, तर त्यामध्ये इतरही अनेक महत्त्वाचे विषय होते. विविध राजकीय पक्ष त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे तसेच इतर पक्षांचे लोकप्रतिनिधी सामूहिकपणे या मागण्यांना पाठिंबा देत होते. आपल्याला हा प्रश्न हाताळता येत नाही, हे लक्षात आल्यानंतर सरकारने वांगचुक यांना पहाटे अटक केली,” असे पवार म्हणाले.
“वांगचुक यांना अटक केली असली, तरी हे आंदोलन थांबणार नाही. त्यांची मागणी रास्त होती. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असतानाही सरकारमधील कोणीही त्यांची भेट घेण्यासाठी आले नाही. यावरून केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येते. हा विषय येथेच थांबणार नाही. संसद अधिवेशनातही याबाबत चर्चा केली जाईल,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत विचारले असता, “राज्य सरकारने ज्या तारखा दिल्या होत्या, त्या पाळायला हव्या होत्या. सरकारने नवीन तारीख जाहीर करेपर्यंत आम्ही प्रतीक्षा करू,” असे पवार यांनी सांगितले.






