शेतकरी कर्जमाफीवरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीअजित पवारांवर टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीसाठी आक्रमक मोर्चा आणि आंदोलन केले. याचबरोबर त्यांनी रेल रोकोचा देखील इशारा दिला. यानंतर आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. मात्र यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सारखंच फुकटात कसं मिळेल असे वक्तव्य केले होते. यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडिया पोस्ट करुन प्रकाश आंबेडक यांनी अर्थमंत्री अजित पवारांना शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असं वाटतं का? असा प्रश्न केला आहे.
काय आहे प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट?
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन अजित पवारांवर रोष व्यक्त केला. प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले आहे की, अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला? अजित पवारजी, तुम्ही म्हणालात, “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी रुपयांचे कॉर्पोरेट कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांच्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रकाश आंबेडकर यांनी पुढे लिहिले की, महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अवकाळी पाऊस, पिकांचे नुकसान आणि शेतमालाला भावाच्या अभावामुळे अडचणीत आहेत. हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात परंतु, तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही! शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी कोणताही मुद्दा नवीन नाही. निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या जाहीरनाम्यात या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, वास्तव असे आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही तिघांनी मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये जाहीर करण्यात आली आहे पण, शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत आहेत! म्हणजे जवळजवळ ३० टक्के कमी! कापसाची स्थितीही तितकीच भयानक आहे. अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांना उद्ध्वस्त केले आहे. ६८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. सरकारने मदत जाहीर केली पण, जमिनीवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत एक पैसाही पोहोचला नाही! शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली आणि आता त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या आहेत. तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी, म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे तुम्हाला वाटते का? शेतकऱ्यांना भिक नको आहे, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत ! वंचित बहुजन आघाडी तुमच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध करते!! अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
अजित पवार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का तुम्हाला? अजित पवारजी, तुम्ही म्हणालात, “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” पण खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार शेतकऱ्यांचे हक्क किती काळ नाकारत राहणार? कधीपर्यंत हजारो कोटी… — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 2, 2025






