पुणे रेव्ह पार्टीवरून विजय वडेट्टीवारांचा गृहखात्यावर निशाणा
Tulapur Rave Party Case: पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले असून तब्बल ७८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्टीत सुमारे १५६ जण सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राज्यभरातुन तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच पुणे पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अश्यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलीस आणि प्रशासनावर गंभीर सवाल उपस्थित करत, “प्रशासनाचा आणि पोलिसांचा हात असल्याशिवाय अशा पार्ट्या पुण्यात घडूच शकत नाहीत,” असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातल्या तुळापूर येथील रेव्ह पार्टीवरून पुणे पोलीस प्रशासनाला चांगलेच घेरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळापूर येथील शिवसंस्कृती बंगल्यात ही रेव पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये अनेक तरुण-तरुणी मद्याच्या नशेत बेभान झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या पार्टीत जवळपास ४९ तरुणी सहभागी असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांना या ठिकाणी छापा टाकल्यानंतर मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट आढळून आले. यावरून वडेट्टीवार यांनी आपल्या X अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे.
आपल्या पोस्टमधून वडेट्टीवार म्हणाले कि, “पुण्याच्या रेव्ह पार्टीमध्ये १५६ तरुण-तरुणी असताना केवळ ७८ जणांवरच एफआयआर का? उरलेल्या ७८ जणांना रात्रीतून कुणाच्या सांगण्यावरून सोडले? त्यातही धक्कादायक म्हणजे, तिथे ड्रग्जचा उघड वापर झाला असताना फक्त २९ लोकांचीच अमली पदार्थांची चाचणी का केली गेली? पैशांच्या जोरावर श्रीमंतांच्या पोरांना अलगद बाहेर काढायचे आणि कारवाईचा बडगा फक्त गरिबांच्या मुलांवरच उगारायचा, हा कुठला न्याय? संपूर्ण १५६ जणांवर गुन्हा दाखल का झाला नाही, याचे उत्तर गृहखात्याने दिलेच पाहिजे. पुण्यात ड्रग्ज रॅकेट फोफावत असताना आणि तरुण पिढी बरबाद होत असताना प्रशासन नक्की काय करत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुण्याच्या रेव्ह पार्टीमध्ये १५६ तरुण-तरुणी असताना केवळ ७८ जणांवरच एफआयआर का? उरलेल्या ७८ जणांना रात्रीतून कुणाच्या सांगण्यावरून सोडले? त्यातही धक्कादायक म्हणजे, तिथे ड्रग्जचा उघड वापर झाला असताना फक्त २९ लोकांचीच अमली पदार्थांची चाचणी का केली गेली? पैशांच्या जोरावर… pic.twitter.com/2yZIuiw6yY — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 9, 2026
ते पुढे म्हणाले, “हे स्पष्ट आहे की, प्रशासनाचा आणि पोलिसांचा हात असल्याशिवाय अशा पार्ट्या पुण्यात घडूच शकत नाहीत. हा केवळ हलगर्जीपणा नसून ड्रग्ज माफियांना दिलेले मूक समर्थन आहे. त्या रात्री कोणाकोणाचे फोन आले आणि कुणाच्या दबावामुळे कारवाई अर्धवट सोडण्यात आली, याची तात्काळ चौकशी झालीच पाहिजे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.






