स्वामी त्यांच्या भक्तांवर रागावतात पण तेवढंच प्रेम देखील करतात. असच स्वामींशी ज्यांचा कित्येक जन्माचं नातं होतं त्या चोळप्पा महाराजांनी जेव्हा देहत्याग केला तेव्हा स्वामी रडले होते. याबाबत अभ्यासक संकेत साने यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. तर झालं असं होतं की, स्वामींचं चोळप्पा महाराजांशी त्यांच्या गतजन्माशी संबंध होता. या जन्मात स्वामींनी चोळप्पा महाराजांना ओळख पटवून दिली. त्यानंतर चोळप्पा महाराजांनी स्वामींना त्यांच्यापासून कधीही दूर केलं नाही. स्वामी अनेकदा चोळप्पा महाराजांसमोर आव्हानं पेरीत असत त्यातून माझा भक्त चोळ्या कसा ताऊन सुलाखून बाहेर पडतो याची स्वामी परिक्षा घ्यायचे. मात्र स्वामींच्या या परिक्षेला चोळप्पा महाराज कधीच त्रासले नाही. त्यांनी स्वामींचा कधी अनादर देखील केला नाही. साक्षात ब्रम्हांडनायक माझ्या घरात वावरत आहेत याचा त्यांना आनंद वाटे. स्वामींकडे दैवीशक्ती असली तरी नियतीपुढे कोणाचं काहीही चालत नाही.
जे भाग्यात लिहिलेलं असतं ते होणारच असतं निसर्गाच्या चक्रापुढे स्वामींनी देखील कधीही हस्तक्षेप केला नाही. जेव्हा चोळप्पा महाराजांच्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवलंय हे स्वामींना कळलं तेव्हा त्यांनी ते होऊ दिलं. जेव्हा चोळप्पा महाराजांचं कमी वयातच जग सोडून जाणं हे विधीलिखित होतं आणि स्वामींनी त्यात हस्तक्षेप केला नाही. चोळप्पा महाराज कायम म्हणायचे ,स्वामी तुम्ही माझ्याच घराजवळ देहत्याग कराल तेव्हा स्वामी एकदा त्यांना म्हणाले की, माझ्याआधी तू देहत्याग करशील आणि तेच झालं. जेव्हा स्वामींवर अपार विश्वास ठेवणाऱ्या त्यांच्या भक्ताचं महानिर्वाण झालं तेव्हा स्वामी चोळप्पा महाराजांसाठी ढसाढसा रडले होते. माझा चोळ्या गेला आता माझ्या लीला मी कोणाला दाखवू ? असं स्वामी म्हणाले होते. चोळप्पा महाराजांच्य़ा जाण्यानंतर काही काळातच स्वामींनी देखील त्यांच्या शेजारीच देहत्याग केला. सांगायचं तात्पर्य हेच की, चांगल्या परिस्थिती आणि कठीण काळातही तुमची तुमच्या गुरुंवर असलेली श्रद्धा आणि विश्वास किती महत्वाचा आहे त्यातून तुमची भक्ती कळते.






