फोटो सौजन्य - Social Media
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मंगल प्रसंग मानला जातो. त्यामुळे लग्नाच्या तयारीत पत्रिकेलाही विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्रानुसार लग्नाची पत्रिका ही केवळ पाहुण्यांना आमंत्रण देण्याचे साधन नसून नव्या आयुष्याची शुभ सुरुवात मानली जाते. त्यामुळे पत्रिकेचा रंग, आकार, डिझाइन आणि त्यावरील मजकूर यांची निवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
वास्तुनुसार लग्नाच्या पत्रिकेसाठी लाल, पिवळा, केशरी, मॅरून किंवा सोनेरी रंग शुभ मानले जातात. लाल रंग प्रेम आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो, तर पिवळा आणि केशरी रंग सकारात्मक ऊर्जा व मंगलकार्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. याउलट काळा, गडद राखाडी किंवा अतिशय नकारात्मक छटा असलेले रंग टाळावेत, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.
पत्रिकेवर भगवान गणेश, स्वस्तिक, ॐ किंवा कलश यांसारखी शुभ चिन्हे असणेही महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः श्रीगणेशाचे चित्र किंवा चिन्ह असल्यास विवाहातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. मात्र देवतांची चित्रे अतिशय आधुनिक किंवा अस्पष्ट स्वरूपात छापणे टाळावे. पत्रिकेचा आकारही वास्तुनुसार महत्त्वाचा मानला जातो. आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या पत्रिका शुभ मानल्या जातात. अंडाकृती, गोल किंवा त्रिकोणी तसेच टोकदार कोपऱ्यांच्या डिझाइनला नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मानले जाते. त्यामुळे अशा डिझाइनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
पत्रिकेतील मजकूर आदरयुक्त, स्पष्ट आणि वाचण्यास सोपा असावा. “ॐ श्री गणेशाय नमः” किंवा एखाद्या मंगल श्लोकाने सुरुवात करणे शुभ मानले जाते. अतिशय गुंतागुंतीचे किंवा वाचण्यास अवघड फॉन्ट वापरणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार लग्नाच्या पत्रिकेसाठी लेदर फिनिश किंवा रासायनिक चमक असलेला कागद वापरणे योग्य मानले जात नाही. त्याऐवजी पर्यावरणपूरक किंवा हँडमेड पेपर अधिक शुभ मानला जातो. पत्रिका छापल्यानंतर पहिली पत्रिका देवघरात गणपतीसमोर अर्पण करावी आणि त्यानंतर कुलदैवताच्या नावाने पत्रिका काढून मगच नातेवाईकांना वाटप सुरू करावे, अशी परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते.






