'आणि दगड गायला लागले'... ६ कोटी वर्षे जुने निसर्गाचे जादुई संगीत; डोंगरांमध्ये लपलेलं 'हे' भारतीय रहस्य तुम्हाला माहीत आहे का? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Kavadiya Hills Dewas musical stones : निसर्गाच्या कुशीत अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत (India History), ज्यांचा वेध घेताना विज्ञानही थक्क होते आणि मानवी कल्पनाशक्तीला एक वेगळेच उधाण येते. अशाच एका अद्भूत आणि अंगावर शहारे आणणाऱ्या अनुभवासाठी आपल्याला मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यामधील घनदाट जंगलात जावे लागेल. या जंगलात पसरलेली भयाण शांतता एका क्षणात भंगावी आणि तिथे एक जादुई संगीत गुंजावे, असा चमत्कार इथे रोज घडतो.
जंगलाच्या शांत वातावरणात जेव्हा एखादा स्थानिक नागरिक खाली वाकतो, एक लहानसा खडा उचलतो आणि समोर उभ्या असलेल्या एका विशाल दगडी स्तंभावर हलकेच प्रहार करतो, तेव्हा पुढच्याच क्षणी एक स्पष्ट, धातूसारखा प्रतिध्वनी हवेत घुमतो. तो दुसऱ्या दगडावर प्रहार करतो, तेव्हा नाद बदलतो. मग तिसऱ्या दगडावर… जणू प्रत्येक दगडाचा स्वतःचा एक वेगळा सूर, स्वतःचा एक वेगळा आवाज आहे! मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील घनदाट सागवानच्या जंगलात लपलेल्या ‘कवडिया टेकड्या’ (Kavadiya Hills) हे निसर्गाचे असेच एक अद्वितीय आणि जादुई आश्चर्य आहे, जिथे खरोखरच ‘दगड गातात’.
जवळपास दोन दशकांपासून, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रसिद्ध भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र जोशी आणि डॉ. विष्णू गाडगीळ या रहस्यमय जागेचा आणि येथील संगीतमय दगडांचा अतिशय बारकाईने अभ्यास करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये कावडिया टेकड्यांवर अनेक महत्त्वाचे शोधनिबंध (Research Papers) प्रकाशित केले आहेत. या दुर्मिळ भूवैज्ञानिक वारशाला (Geological Heritage) संपूर्ण देशात आणि जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी त्यांनी एकत्रितपणे आयएनटीएसीएच (INTACH) साठी एक सविस्तर प्रबंधही तयार केला आहे, जेणेकरून या ऐतिहासिक वारशाचे जतन करता येईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Ahmadinejad Mossad Agent: शतकातील सर्वात मोठा गद्दार? इराणला अण्वस्त्रांचे स्वप्न दाखवणारा नेताच निघाला इस्रायलचा हस्तक
कावडिया टेकड्यांच्या सुमारे ८ किलोमीटरच्या विस्तीर्ण पट्ट्यात हजारो प्रचंड बेसॉल्टचे स्तंभ (Basalt Columns) जमिनीला समांतर म्हणजेच आडवे पडलेले दिसतात. दूरून या टेकड्यांकडे पाहिल्यास डोळ्यांवर विश्वास बसत नाही. जणू एखाद्या महाकाय कारागिराने अत्यंत कौशल्याने एकावर एक लाकडी ओंडके रचून ठेवले आहेत, असा भास होतो. निसर्गाची ही रचना थक्क करणारी आहे.
इथल्या प्रत्येक दगडी स्तंभाला विशिष्ट असे सहा कोपरे (Hexagonal Pillars) आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, आजपासून तब्बल ६६ दशलक्ष (६.६ कोटी) वर्षांपूर्वी दख्खनच्या ज्वालामुखीचा (Deccan Volcanic Eruption) प्रचंड उद्रेक झाला होता. त्यातून बाहेर पडलेला लाव्हा अत्यंत संथ गतीने आणि विशिष्ट तापमानात थंड झाल्यामुळे ही वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक रचना तयार झाली आहे.
तसे पाहायला गेले तर, अशा प्रकारचे बेसॉल्ट स्तंभ जगात इतरही काही ठिकाणी आढळतात, जिथे ते सरळ उभे असलेले दिसतात. परंतु, कावडिया टेकड्यांमधील या स्तंभांचे आडवे स्वरूप त्यांना संपूर्ण जगात अत्यंत दुर्मिळ आणि युनिक बनवते. डॉ. नरेंद्र जोशी यांच्या मते, या दगडांचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे त्यांचा ‘नाद’ (Resonance) आहे. या विशिष्ट स्तंभांवर लहान खड्याने हलकासा आघात केला तरी घंटा वाजवल्यासारखा किंवा धातूवर प्रहार केल्यासारखा स्पष्ट आवाज येतो, जो पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Global Fuel Crisis : भारतात आहेत 23 तेल शुद्धीकरण कारखाने; जाणून घ्या किती वापरले जाते किती होते तेल उत्पादन?
कावडिया टेकड्यांचा इतिहास आणि त्यांच्याशी जोडलेली श्रद्धा खूप खोल आहे. स्थानिक लोकांमध्ये या जागेबाबत एक अत्यंत रंजक पौराणिक कथा प्रचलित आहे. लोकांचा असा दृढ विश्वास आहे की, महाभारताच्या काळात माता कुंतीच्या आज्ञेवरून बलशाली भीमाने नर्मदा नदीवर मार्ग (पूल) बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी तो हे प्रचंड दगडी स्तंभ कावडियामध्ये घेऊन जात होता.
तथापि, सूर्योदयापूर्वी हे काम पूर्ण होऊ शकले नाही, अशी अट किंवा कथा होती. सकाळ होताच भीमाचे काम अपूर्ण राहिले आणि ते अवाढव्य दगड या घनदाट जंगलात जसेच्या तसे विखुरले गेले. भीमाने हे दगड कावडीसारखे वाहून आणले होते, या लोकश्रद्धेमुळेच या निसर्गरम्य ठिकाणाला ‘कवडिया टेकड्या’ असे नाव पडले. विज्ञान याला ज्वालामुखीची किमया मानत असले, तरी स्थानिक संस्कृतीने याला महाभारताच्या स्मृतींशी जोडून जिवंत ठेवले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) भोपाळ मंडळाचे अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ, मनोज कुमार कुर्मी म्हणतात की, अशी नैसर्गिक वारसा स्थळे केवळ पर्यटनाच्या दृष्टीनेच सुंदर नाहीत, तर त्यांच्यामध्ये पृथ्वीचा लाखो-करोडो वर्षांचा भौगोलिक इतिहास सामावलेला आहे. त्यांच्या मते, एएसआयची सध्या या कवडिया टेकड्यांना अधिकृत ‘भू-वारसा’ (Geo-Heritage Site) दर्जा देण्याची कोणतीही तात्काळ योजना नाही. तथापि, मध्य प्रदेश राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास, ते याला राज्य वारसा स्थळ म्हणून घोषित करू शकतात आणि तिथे पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा विकसित करू शकतात. यामुळे या निसर्गाच्या जादुई संगीताला जगभरातून ऐकण्यासाठी पर्यटक आणि संशोधक इथे नक्कीच गर्दी करतील.






