जागतिक कागदी पिशवी दिवस (फोटो- सोशल मीडिया)
कागदी पिशव्या प्रामुख्याने लाकडाच्या लगद्यापासून किंवा पुनर्वापरित कागदापासून तयार केल्या जातात. पुनर्वापरित कागदाचा वापर केल्यास नवीन झाडांची गरज कमी होते. मात्र, नव्या कागदासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड आवश्यक असल्याने वनसंपत्तीवरील दबाव वाढू शकतो.
कागद निर्मिती प्रक्रियेत पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. लगदा तयार करणे, कागदाचे पत्रे बनवणे आणि ब्लीचिंग यासाठी पाणी आवश्यक असते. एका टन कागदी लगद्यासाठी साधारण २० हजार ते ६० हजार लिटरपर्यंत पाणी लागू शकते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यात रसायने, तंतू आणि ब्लीचिंग घटक असू शकतात. योग्य प्रक्रिया न झाल्यास हे घटक जलस्रोतांमध्ये मिसळून जलचर परिसंस्थेवर परिणाम करू शकतात.
पावसाच्या सरींमध्ये रुजतंय हरित स्वप्न; ‘फॉरेस्ट’चा १० लाख सीडबॉल्सचा संकल्प
कागद निर्मिती ही ऊर्जा-केंद्रित प्रक्रिया असल्याने कार्बन उत्सर्जनही होते. उत्पादनादरम्यान सल्फर ऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म कण यांसारखे प्रदूषक हवेत मिसळू शकतात. शाई, कोटिंग आणि चिकट पदार्थांच्या वापरामुळे कागदी पिशव्यांचा पर्यावरणीय ठसा आणखी वाढतो.
आई शप्पथ! 23% पावसाचे थेंब जमिनीवर पोहोचण्याआधीच…; ‘ IITM ‘च्या संशोधनातून निष्कर्ष
‘कागदी पिशवी ही प्लास्टिकला पर्याय आहे; पण ती पूर्णपणे पर्यावरणीय परिणाममुक्त नाही. खरा पर्यावरणपूरक मार्ग म्हणजे कमी वापर, वारंवार पुनर्वापर आणि योग्य विल्हेवाट हा आहे. एखाद्या वस्तूला पर्यावरणपूरक म्हणण्यापूर्वी तिच्या संपूर्ण जीवनचक्राचा विचार करणे गरजेचे आहे. कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, वापर आणि पुनर्वापर या सर्व बाबी महत्त्वाच्या असतात.’
– पूजा सोनसाळे, पर्यावरण अभ्यासक






