Womens Day 2026 : खेडेगावात 10 किमी पायपीट करत घेतले शिक्षण; आज डॉ. बोराडे सांभाळत आहेत पुणे शहराच्या आरोग्य व्यवस्थेची धुरा
पुणे : धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्याशा दुर्गम खेड्यातून सुरू झालेला प्रवास, पायपीट करत घेतलेले शिक्षण आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले यश…ही कहाणी आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुख तथा आरोग्य अधिकारी डॉ. नीना मधुकर बोराडे यांची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण, सामाजिक कार्य आणि आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. बोराडे यांचा संघर्षमय प्रवास आज अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
डॉ. बोराडे या चिंचवडच्या संभाजीनगर येथे कुटुंबियांसह राहतात. धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील ब्रह्माचीवाडी या अवघ्या ३०० लोकवस्तीच्या गावात त्यांचा जन्म झाला. त्या काळात गावात वीज नव्हती, बससेवा नव्हती आणि मूलभूत सुविधांचाही अभाव होता. वडील शिक्षक, आई गृहिणी आणि पाच भावंडे अशा कुटुंबात त्यांचे बालपण गेले. गावात चौथीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी मुलींचे शिक्षण थांबण्याची वेळ येत असे. मात्र, डॉ. नीना यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. पाचवी ते सातवीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहा येथे रोज पायी प्रवास करत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कळंब येथे आठवी ते बारावीचे शिक्षण घेत त्यांनी पुढील वाटचाल सुरू ठेवली. पुढे लातूर येथील एमआयटी महाविद्यालयातून एमबीबीएस आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमडी (पीएसएम) पदवी मिळवत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवले.
१९९८ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील वालवड प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी शासकीय सेवेला सुरुवात केली. ग्रामीण भागात काम करताना त्यांनी कुपोषण निर्मूलन, बोगस डॉक्टरांविरोधातील मोहिमा आणि आरोग्य जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवले. मंगरूळपीर येथे कोविड काळात जम्बो कोविड सेंटरच्या प्रभारी म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. नांदेड येथे जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी म्हणून काम करताना किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’ हा उपक्रम राबवून रक्तक्षय कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सध्या त्या २६ जुलै २०२४ पासून पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुख तथा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शहरातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी रुग्णालयांचे आधुनिकीकरण, बाल लसीकरण, रेबीज नियंत्रण आणि कुटुंब कल्याण यांसारख्या विविध योजनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे.
ग्रामीण भागातील समस्यांची जाण असल्यामुळे त्यांनी प्रशासकीय पदाला केवळ नोकरी न मानता जनसेवेची संधी मानली. उच्च पदावर असूनही जमिनीशी नाळ जोडून ठेवत प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. जिद्द, परिश्रम आणि सेवाभावाच्या बळावर घडलेला त्यांचा प्रवास आज अनेक महिलांना मोठी प्रेरणा देणारा ठरत आहे.
हेदेखील वाचा : Womens Day 2026: स्त्री तुझा गौरव अन् ‘स्त्रीत्वाचा’ उत्सव; महिला दिनानिमित्त वाचा ‘या’ खास दिवसाचा इतिहास आणि महत्व






