सौजन्य - Shoaib Akhtar 'त्यांना तिथेच ठोकून या......'; शोएब अख्तर पुन्हा बरळला, भारतीय संघ देणार का उत्तर
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संपूर्ण प्रकरणावर खूश नाही. ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाईल यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली असली तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) याला मान्यता देण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. पीसीबीला ही स्पर्धा संपूर्ण पाकिस्तानमध्ये आयोजित करायची होती, परंतु, ICC च्या नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर त्यांची भूमिका मवाळ झाली आहे. त्याचवेळी PCB आता भारतात होणाऱ्या ICCच्या सर्व स्पर्धाही हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवल्या जाव्यात, अशी मागणी करीत आहे. अख्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी सहमत आहे की ही स्पर्धा आता हायब्रीड मॉडेलमध्ये होणार असल्याने पाकिस्तानला अधिक महसूल मिळायला हवा. पण, भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानने भारताचा दौरा करू नये हे त्याला मान्य नाही.
काय म्हणाला शोएब अख्तर?
शोएब अख्तर म्हणतो, ‘तुम्हाला होस्टिंगचे अधिकार आणि कमाई मिळत आहे, हे ठीक आहे. पाकिस्तानची मागणीही रास्त आहे. त्यांनी ठाम भूमिका ठेवायला हवी होती. जर आपण आपल्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करू शकलो आणि ते (भारतीय संघ) यायला तयार नसतील तर त्यांनी अधिक महसूल वाटून घ्यावा. ही चांगली मागणी आहे.
पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा
पण, पीसीबीने भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा, असेही अख्तर यांचे मत आहे. शोएब अख्तर पुढे म्हणाला, ‘भविष्यात भारतात खेळायचे झाल्यास मैत्रीचा हात पुढे करून तिकडे जायला हवे. माझा नेहमीच विश्वास आहे की भारतात जा आणि तिथे त्यांचा पराभव करा. ‘भारतात खेळा आणि तिथे त्यांना हरवून परत या’.
भारताचे सामने दुबईत होऊ शकतात
ताज्या अहवालांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने दुबईमध्ये आयोजित केले जातील, तर उपांत्य फेरी (भारत जिंकल्यास) आणि अंतिम (भारत जिंकल्यास) तेथे खेळले जाऊ शकतात. जर भारत बाद फेरीत पोहोचला नाही तर उपांत्य फेरी आणि अंतिम दोन्ही सामने पाकिस्तानमध्ये होतील.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलसाठी तयार
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रीड मॉडेलसाठी तयार आहे. पण, त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पीसीबी यूएईशी बोलणार आहे. टीम इंडियाचे सामने तटस्थ ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे भारत युएईमध्ये आपले सामने खेळू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतचा अंतिम निर्णय शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी अधिकृतपणे जाहीर केला जाऊ शकतो.
पाकिस्तान बोर्डाचे अधिकारी सहभागी
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC ने शुक्रवारी बैठक घेतली होती. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान बोर्डाचे अधिकारी सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत कोणताही निर्णय न झाल्याने तो पुढे नेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आता हायब्रीड मॉडेलसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे टीम इंडिया आपले सामने यूएईमध्ये खेळू शकते. पण त्याची अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.
हेही वाचा : अखेर पाकिस्तान नरमले; चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलद्वारेच होणार; महत्त्वाची अपडेट आली समोर