पावसाच्या थेंबांचे सरासरी २३ टक्के बाष्पीभवन (फोटो- ai gemini)
सरासरी २३ टक्के थेंब हवेतच बाष्पीभूत होत असल्याचा निष्कर्ष
प्रत्यक्ष जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी
मान्सूनच्या अंदाजाच्या अचूकतेवरही त्याचा परिणाम
सुनयना सोनवणे /पुणे: आकाशातून पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब जमिनीपर्यंत पोहोचतोच असे नाही, हे ‘भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ (आयआयटीएम), पुणेच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात, विशेषतः पुणे परिसरात, ढगातून जमिनीकडे येताना पावसाच्या थेंबांपैकी सरासरी २३ टक्के थेंब हवेतच बाष्पीभूत होत असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संशोधकांनी नोंदविला आहे. या प्रक्रियेमुळे (Enviornment) प्रत्यक्ष जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी होत असून, मान्सूनच्या अंदाजाच्या अचूकतेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
‘आयआयटीएम’च्या हवामान बदल संशोधन केंद्रातील संशोधकांनी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ आणि तैवानमधील ॲकॅडेमिया सिनिका यांच्या सहकार्याने हा अभ्यास केला आहे. हा संशोधन निबंध नुकताच ‘ॲटमॉस्फेरिक केमिस्ट्री अँड फिजिक्स’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासासाठी २०१९ च्या मान्सून हंगामात पुण्यातील पावसाच्या पाण्याचे आणि वातावरणातील बाष्पाचे नमुने एकाच वेळी संकलित करून त्यांचे विश्लेषण करण्यात आले.
झाडांच्या मुळाशी करवतीचे घाव! कर्जतच्या ‘या’ गावात नेमकं काय घडतंय? पर्यावरणप्रेमी का संतापले?
या संशोधनात पावसाच्या पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनच्या स्थिर समस्थानिकांचा (स्टेबल आयसोटोप्स) अभ्यास करण्यात आला. पावसाचे थेंब ढगातून जमिनीवर येताना त्यांचे किती बाष्पीभवन होते, हे मोजण्यासाठी ‘बिलो क्लाउड इंटरॲक्शन मॉडेल’ (बीसीआयएम) या संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात आला. तापमान, आर्द्रता आणि वातावरणातील बाष्प यांमुळे थेंब जमिनीवर पडण्यापूर्वीच काही प्रमाणात विरून जात असल्याचे यातून स्पष्ट झाले. हे बाष्पीभवन वातावरणानुसार चार ते ६१ टक्क्यांपर्यंत बदलत असून, संपूर्ण मान्सून हंगामात त्याचे सरासरी प्रमाण २३ टक्के आहे. विशेषतः कमी पर्जन्यमानाच्या काळात ही प्रक्रिया अधिक प्रभावी ठरत असल्याने प्रत्यक्ष जमिनीवर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते.
मान्सूनच्या स्वरूपावरही परिणाम –
पावसाच्या थेंबांचे बाष्पीभवन केवळ पर्जन्यमान कमी करत नाही, तर वातावरणातील उष्णतेचे संतुलन आणि ढगनिर्मितीच्या प्रक्रियेवरही परिणाम करते. थेंबांचे बाष्पीभवन झाल्यामुळे वातावरणाचा खालचा थर थंड होतो, हवेचे प्रवाह बदलतात आणि मान्सूनमधील संवहन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उष्णकटिबंधीय भागातील पावसाचे स्वरूप बदलण्याची शक्यता असल्याचे संशोधकांनी नमूद केले आहे.
अधिक अचूक हवामान अंदाजाला मदत –
सध्या मान्सूनचा अंदाज वर्तविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हवामान मॉडेलमध्ये पावसाच्या थेंबांच्या बाष्पीभवनाचा पुरेसा विचार केला जात नाही. त्यामुळे या प्रक्रियेचे अचूक मापन भविष्यातील हवामान मॉडेल अधिक विश्वासार्ह आणि अचूक बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे मान्सूनचा अंदाज, जलसंपदा व्यवस्थापन, शेती नियोजन आणि हवामान बदलाच्या अभ्यासालाही मोठी मदत होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष –
– ढगातून जमिनीकडे येताना पावसाच्या थेंबांचे सरासरी २३ टक्के बाष्पीभवन होते.
– वातावरणातील स्थितीनुसार हे प्रमाण ४ ते ६१ टक्क्यांपर्यंत बदलू शकते.
– कमी पर्जन्यमानाच्या काळात थेंबांचे बाष्पीभवन अधिक होते.
– पावसाचे प्रमाण, मान्सूनची संवहन प्रक्रिया आणि हवामानाच्या अंदाजावर या प्रक्रियेचा थेट परिणाम होतो.
– भविष्यातील हवामान मॉडेल अधिक अचूक करण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा मानला जात आहे.






