भारत वि पाक सामना(फोटो-सोशल मीडिया)
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. या सामन्याबाबत माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, या सामन्यावर बहिष्कार टाकणार आहे आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या महत्त्वाच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण ते पाहणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. यानंतर आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्यावर लागून असणार आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : शुभमन गिलचा षटकार पाहताच वसीम अक्रम चक्रावला! रिएक्शन झाली व्हायरल; पहा व्हिडिओ
माजी क्रिकेटपटू आणि बंगाल सरकारमधील मंत्री मनोज तिवारी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे खूपच अन्याय्य आहे, कारण ही गोष्ट आपल्या लोकांच्या बलिदानाचा अपमान देखील आहे. बीसीसीआयच्या करारामुळे खेळाडू बोलत नाहीत, परंतु केंद्र सरकार आणि बीसीसीआयकडून या सामन्याला परवानगी देण्यात येऊ नये.
हावडा येथे माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज तिवारी म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कअ खेळवण्यात येत आहे? हा सामना खेळवण्यात येऊ नये, दहशतवादी पाकिस्तानातून येतात आणि आपल्या निष्पाप लोकांचा बळी घेतात आणि निघून जातात. म्हणूनच, पाकिस्तान क्रिकेट संघासोबत सामना खेळण्याचा कोणताच प्रश्नच निर्माण होत नाही.”
तिवारी पुढे ते म्हणाले की, “पाकिस्तानला देखील या गोष्टीची माहिती आहे की, त्यांच्या देशातील दहशतवादी हे भारतात दहशत पसरवत असतात, ते त्यांना संपवू शकत नाहीत का? आमचे केंद्र सरकार आता काय करत आहे, ते झालेल्या पहलगाम दहशतवादी घटनेला इतक्या लवकर विसरले आहेत का? आमचे निष्पाप लोक मारले गेले आहेत. अशा वेळी, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करणार नाही , तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत सामना खेळू शकत नाही.
माजी क्रिकेटपटू तिवारी यांनी म्हटले आहे की, “मी १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना पाहणार नाही. मी या सामन्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकत आहे. आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना वगळता सर्व सामने हे वेळापत्रकानुसारच झाले पाहिजे. पण, भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्यात यावी.”






