राज्य सरकारकडून विश्वविजेत्या खेळाडूंसह प्रशिक्षकांचा सन्मान(फोटो-सोशल मीडिया)
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत संघातील खेळाडू स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव तसंच प्रशिक्षक अमोल मुजुमदार(२२.५ लाख) यांचा मानधन स्वरूपात सन्मान केला गेला. त्याचप्रमाणे माजी क्रिकेटपटू डायना एडुल्जी आणि सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा देखील भारतीय क्रिकेटमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव करण्यात आला आहे. जेमिमाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावा केल्या होत्या. तर स्पर्धेत स्मृती भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. राधा सेमीफायनल आणि फायनल दोन्हीमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये होती.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत लिहिले की, “भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकून देशाचं नाव जगभर उज्ज्वल केलं आहे. हा विजय फक्त क्रिकेटमधला नाही, तर प्रत्येक भारतीयासाठीच्या अभिमानाचा क्षण आहे. महिला क्रिकेट संघानं मनं आणि हृदयं दोन्ही जिंकली आहेत. १९८३ साली श्री. कपिल देव यांनी देशाला मिळवून दिलेलं विश्वविजेतेपद आज आपल्या महिला क्रिकेटपटूंनी नव्या पर्वात नोंदवलं आहे. हा दिवस म्हणजे पुन्हा एकदा दिवाळीचा उत्सवच!” पुढे त्यांनी लिहिल की, “ग्रामीण भागातील अनेक मुलींना या यशानं प्रेरणा मिळेल. योग्य संधी मिळाल्यास त्या देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधित्व करू शकतात, याचा मला मनापासून अभिमान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!”






