फोटो सौजन्य - Social Media
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मुळे मानव निरुपयोगी होतील, ही भीती चुकीची असल्याचे Cisco चे अध्यक्ष आणि मुख्य उत्पादन अधिकारी जीतू पटेल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, मानवी बुद्धिमत्ता आणि मशीन-स्तरीय ऑटोमेशन यांचा योग्य संगम साधल्यास मानवी क्षमतांना अधिक बळ मिळते आणि प्रगतीची नवी दारे खुली होतात.
पटेल म्हणाले की, एआयचा उद्देश मानवांची जागा घेणे नसून त्यांच्या कामाला गती देणे आहे. आज एआय प्रणाली वेगाने विकसित होत असून, चॅटबॉट्सपासून ते स्वायत्त एजंट्सपर्यंत अनेक साधने उपलब्ध आहेत. ही साधने मानवी निर्णयक्षमतेला पूरक ठरतात. जेव्हा मानवी विचारशक्ती आणि एआयची गती एकत्र येते, तेव्हा अधिक परिणामकारक कामगिरी साध्य होते. वाढत्या ऑटोमेशनमुळे काही नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार, काही भूमिका संपुष्टात येणार हेही त्यांनी मान्य केले. मात्र त्याचवेळी नवीन उद्योग आणि संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नोकरी बदलत जाईल, पण एआयमुळे पूर्णपणे रोजगार नाहीसे होतील, ही धारणा चुकीची आहे. उलट, समाजात योगदान देण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतील.
एआय विकासाच्या टप्प्यांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, सुरुवातीला चॅटबॉट्स ही मोठी क्रांती वाटली, पण आता ती सामान्य झाली आहेत. पुढील टप्प्यात स्वायत्त प्रणाली अधिक सक्षम होणार आहेत. तरीही, मानवी सर्जनशीलता, सहानुभूती आणि निर्णयक्षमता यांची जागा कोणतीही मशीन घेऊ शकत नाही. परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानवी क्षमता मोठी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. उदाहरण म्हणून त्यांनी स्वयं-चालक वाहनांचा उल्लेख केला. सुरुवातीला ड्रायव्हरलेस कारमध्ये बसणे विचित्र वाटते, पण काही वेळानंतर ते सहज वाटू लागते. यावरून तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची मानवी क्षमता स्पष्ट होते.
खर्चाच्या मुद्द्यावर बोलताना पटेल म्हणाले की, सध्या एआयचे प्रशिक्षण महाग असले तरी भविष्यात त्यात मोठी घट होईल. त्यामुळे एआय अधिक सर्वसामान्य होईल. मात्र, एआयचा वापर मानवकेंद्री दृष्टिकोनातूनच केला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. शेवटी, एआय ‘डिजिटल सहकारी’ म्हणून काम करेल, पण मानवी देखरेख आणि सहभाग अत्यावश्यक राहील. सहानुभूती, सर्जनशीलता आणि सामाजिक मूल्ये ही मानवी वैशिष्ट्ये कायम महत्त्वाची राहणार असून, एआय ही त्यांची पूरक शक्ती ठरेल.






