चीन बनला पाठिराखा! पाकिस्तान अन् तालिबानमध्ये बनतोय मैत्रीचा दुवा; भारताला धोका? (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
बिजिंग: भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान चीनने पाकिस्तानला आपला उघड पाठिंबा दर्शवला होता. आता चीनने भारताविरोधी आणखी एक डाव खेळत आहे. चीनने पाकिस्तान आणि तालिबानमध्ये शांतता करार घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी चीनने काबूलपासून बिजिंगपर्यंत एक लॉबी सुरु केली आहे. याअंतर्गत पाकिस्तान आणि तालिबनमध्ये बैठकी देखील घडवून आणली. परंतु चीनचा हा प्रयत्न भारतासाठी धोकादायक मानला जात आहे.
या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार, तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री उपस्थित होते. तसेच या बैठकीसाठी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी देखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमध्ये जुन्या संबंधावर आणि नवीन संबंध प्रस्थापित करण्यावर चर्चा करण्यात आली.
पाकिस्तानचा अंतर्गत मुद्दा असो किंवा बाह्य मुद्दा असो चीनने प्रत्येक चर्चेत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने पाकिस्तानच्या गुप्तचर बैठकांमध्ये अनेक वेळा सहभाग घेतला आहे. तसेच पाकिस्तानसाठी बाह्य रणनीती आखण्यातही चीनने अनेक वेळा मदत केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या काश्मीर मुद्द्यातही चीनने अनेक वेळा ढवळाढवळ केली आहे.
चीनने पाकिस्तानला नेहगमीच उघडपणे समर्थन दर्शवले आहे. यासंबंधी चीनने एक निवदेन जारी केले आहे. या निवेदनात चीनने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या राष्ट्रीय एकतेसाठी चीन त्यांच्यासोबत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या काळातही शस्त्रे आणि उपग्रहाची माहिती चीनने पुरवली होती. परंतु भारताने चीनची हवाई प्रणाली हाणून पाडली.
दरम्यान चीन आता तालिबान आणि पाकिस्तानला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. अफगाणिस्तानने भारताला खरा मित्र म्हणून संबोधले आहे. परंतु चीनचा प्रयत्न सफल झाल्यास भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.