पंतप्रधान मोदींच्या चीन दौऱ्याबद्दल चिनी मीडिया काय लिहित आहे ते जाणून घ्या, राजनैतिकतेचा नवा खेळ की अमेरिकेला संदेश? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
SCO Summit 2025 : शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) शिखर परिषद २०२५ चीनच्या तियानजिन शहरात सुरु होत आहे. या परिषदेतील सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या भेटीकडे केवळ आशिया नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही वर्षांत भारत-चीन संबंधांत तणावाचे वातावरण होते सीमेवरील चकमकी, व्यापारी करारांतील अडथळे आणि अमेरिका-चीन संघर्षाचा अप्रत्यक्ष परिणाम. पण आता जागतिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचा चीन दौरा केवळ राजनैतिक सौजन्यापुरता मर्यादित नसून बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत भारताची नवी सक्रियता दाखवतो.
चीनचे अधिकृत वृत्तपत्र चायना डेलीने आपल्या संपादकीयात लिहिले आहे की “मोदींची भेट भारत-चीन संबंधांना नवीन गती देणारी ठरू शकते.” अमेरिकेच्या शुल्क धोरणामुळे जागतिक व्यापारात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने धोरणात्मक स्वायत्ततेचा मार्ग निवडणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने मोदींच्या वक्तव्याचा उल्लेख करताना म्हटले की, भारत लहान व्यापारी, शेतकरी आणि पशुपालकांचे हित जपण्यासाठी कोणत्याही दबावाला तोंड देईल. अमेरिकेने भारतीय निर्यातीवर २५% अतिरिक्त दंडात्मक शुल्क लादल्यानंतर भारतावर एकूण ५०% करभार आला आहे. या कठीण परिस्थितीत चीनसोबत सहकार्याचा मार्ग भारतासाठी नवी संधी उघडतो, असे शिन्हुआचे मत.
गेल्या काही वर्षांत भारताने अमेरिकेशी वाढते संबंध प्रस्थापित केले, मात्र शुल्क धोरणांमुळे दोन्ही देशांमध्ये मतभेद वाढले आहेत. रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करण्याचा भारताचा निर्णयही अमेरिकेला रुचलेला नाही. त्यामुळे आता भारतासमोर मोठे आव्हान आहे अमेरिकेशी संबंध कायम ठेवणे आणि त्याचवेळी चीनसारख्या प्रादेशिक महासत्तेशी नवे पूल बांधणे. ‘गुआंचा’ या चीनच्या राष्ट्रवादी वेबसाइटने स्पष्ट केले आहे की भारत आता चीनशी जवळीक साधून अमेरिकेसमोर सौदेबाजीची ताकद वाढवू इच्छितो. भारताचे धोरण केवळ एकतर्फी न राहता, एससीओ आणि क्वाड या दोन्ही गटांमध्ये संतुलन साधण्याचे आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia Protests : 50 लाखांचा भत्ता अन् भडकली जनता; इंडोनेशियात अर्थमंत्र्यांच्या घरावर हल्ला, निदर्शनांना हिंसक वळण
हाँगकाँग बॅप्टिस्ट विद्यापीठाचे संशोधक अर्जुन चॅटर्जी यांनी या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर लिहिले की, “कनेक्टिव्हिटी, बिगर-कृषी व्यापार, पर्यावरणीय करार आणि लोक-ते-लोक संपर्क ही क्षेत्रे भारत-चीन सहकार्याला नवी ऊर्जा देऊ शकतात.” चिनी माध्यमांचा सूर जरी सकारात्मक वाटत असला तरी प्रत्यक्ष सहकार्य कितपत वाढेल हे अजून सांगणे कठीण आहे. कारण सीमेवरील प्रश्न, धोरणात्मक अविश्वास आणि चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हवरील भारताची असहमती ही आव्हाने कायम आहेत.
मोदींचा हा दौरा केवळ द्विपक्षीय चर्चांपुरता मर्यादित नाही. या भेटीद्वारे भारत जागतिक स्तरावर संदेश देत आहे—“भारत कोणत्याही एका गटाच्या प्रभावाखाली जाणार नाही.” अमेरिकेचे शुल्क धोरण, चीनसोबतचे नाते, रशियाकडून ऊर्जा खरेदी आणि एससीओ सारख्या संघटनांत सक्रिय सहभाग या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भारत जगाला दाखवत आहे की तो एक स्वायत्त, संतुलित आणि बहुमुखी राजनैतिक भूमिका घेणारा देश आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Balochistan Protest: बलोचिस्तानमध्ये लोकशाहीची गळचेपी; कलम 144 लागू, पाकिस्तान सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न
चिनी माध्यमे मोदींच्या दौऱ्याकडे सहकार्याच्या नव्या संधी म्हणून पाहत आहेत. मात्र भारतासाठी ही भेट केवळ चीनपुरती मर्यादित नाही, तर अमेरिकेच्या दडपशाहीला उत्तर देणारी एक रणनीती आहे. आगामी काही महिने भारताची परराष्ट्रनीती कोणत्या दिशेने वळते, हे जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.