(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
बीएसईचा ३०-शेअरचा बेंचमार्क निर्देशांक जवळपास २८०० अंकांनी किंवा ४ टक्क्यांनी उसळी घेऊन ७७३९२ च्या पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे, निफ्टीदेखील ८०० हून अधिक अंकांनी किंवा ३.५ टक्क्यांनी वाढून २३९३९ च्या पातळीवर पोहोचला. ही तेजी इतकी जोरदार होती की, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप सेगमेंटमध्येही ३ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली पाहायला मिळाली. पण ही तेजी इतकी का दिसून आली, नेमकी काय अशी कारणं आहेत ज्यामुळे शेअर बाजारावर इतका चांगला परिणाम झाला? समजून घेऊयात.
शेअर बाजारातील या अचानक झालेल्या तेजीचा असा परिणाम झाला की, बीएसईवर सूचीबद्ध असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४२९ लाख कोटी रुपयांवरून ४४३ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांनी अवघ्या काही मिनिटांत १४ लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. शेअर बाजारातील तेजीचे हे सर्वात मोठे कारण आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे आणि त्यामुळे पश्चिम आशियातील युद्धाचा धोका टळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाच्या किमती १७ टक्क्यांहून अधिक घसरून ९५ डॉलरच्या खाली आल्या. भारत आपल्या तेलाच्या गरजेपैकी ८५ टक्के आयात करत असल्याने, तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे भारतीय कंपन्यांना नफ्याची हमी मिळाली आहे. त्यामुळे याचा परिणाम सगळ्या कंपन्यांच्या शेअर्सवर तर झाला पण यामुळे कुठे तरी महागाई पण घटणार असल्याचे संकेत मिळाले.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आपल्या धोरण बैठकीत रेपो दर ५.२५% वर स्थिर ठेवल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांना चालना मिळाली.
शेअर बाजारातील तेजीमध्ये शॉर्ट कव्हरिंग हा देखील एक घटक मानला जातो. बाजारात आधीच मोठी घसरण झाली होती. जसजशी सकारात्मक बातमी येऊ लागली, तसतसे ट्रेडर्सनी त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स बंद करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे बाजारात वेगाने तेजी आल्याचं पाहायला मिळालं आहे.






