फोटो सौजन्य - Social Media
२०२६–२७ पासून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, राज्य शासन शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढवणे, शिक्षक भरती पारदर्शक पद्धतीने करणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यावर भर देत आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत असल्याची चिंता असली तरी सरकारच्या प्रयत्नांमुळे २०२६–२७ पासून ही संख्या वाढेल, असे त्यांनी आश्वासन दिले.
शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर भाष्य करत मंत्री भुसे म्हणाले की, राज्यात सध्या १,०८,०६५ शाळा कार्यरत आहेत. त्यामध्ये ६४,४७७ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, २४,३८० खासगी अनुदानित शाळा आणि १९,२०८ स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत. शाळांमधील सुविधा तपासण्यासाठी यू-डायस प्रणाली वापरली जाते. शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सुरक्षित इमारत, ई-सुविधा, क्रीडांगण, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा अशा मूलभूत सुविधा राज्य, केंद्र शासन, जिल्हा नियोजन समिती, सीएसआर निधी, स्थानिक विकास निधी आणि विविध विभागांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिक्षक भरतीबाबत त्यांनी सांगितले की, टीईटी परीक्षा आणि ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. २०१७ मध्ये ९,२१४ शिक्षकांची भरती करण्यात आली होती, तर २०२२ मध्ये २३ हजारांहून अधिक शिक्षक पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त झाले. सध्या संचमान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्यानुसार नवीन शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये कला आणि क्रीडा विषयांचे शिक्षकही समाविष्ट असतील. पेसा क्षेत्रातील भरतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांनुसार पुढील प्रक्रिया केली जाईल. निवृत्त शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त असले तरी संचमान्यता झाल्यानंतर नियमित शिक्षक उपलब्ध करून दिले जातील.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील गरदरेवाडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळेचे एका महिन्यात कायापालट करण्यात आले आहे. या यशस्वी उपक्रमातून प्रेरणा घेऊन आसपासच्या १०० गावांनीही आपल्या शाळा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंत्री भुसे यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन आणि गणित कौशल्य तपासण्यासाठी शाळांना नियमित भेटी व व्हिडिओ कॉलद्वारे आढावा घेण्याची योजना राबविली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आरोग्य पत्रिका तयार करण्याचेही नियोजन आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.






