सौजन्य - नवराष्ट्र टीम
अलीकडेच वासुंबे (ता. तासगाव) येथेही अशाच प्रकाराची नोंद झाली होती. त्यामुळे तासगाव तालुक्यात अंधश्रद्धेचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होते. विज्ञानवादी आणि पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार उघडकीस येणे ही खरोखरच दुर्दैवी व चिंताजनक शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, लिंबू, दोरे, रंग, अंडी या व अशा इतर साहित्याने कोणतेही भानामतीचे किंवा जादूटोण्याचे परिणाम होत नाहीत. या थोतांडांमुळे काहीही बदलत नाही; बदलतो तो फक्त लोकांचा भ्रम, असे विज्ञाननिष्ठ कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. परंतु भीती, अज्ञान आणि निवडणुकीच्या वातावरणातील अफवांमुळे अशा ‘काळ्या विधीं’ना खतपाणी मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांचा वापर काहीजण अंधश्रद्धेच्या खेळासाठी करतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अशा कृतींना राजकीय संरक्षण अथवा फायदा मिळत असल्यास त्याची कसून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
प्रशासन आणि समाजाची तातडीची जबाबदारी
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पुन्हा अशी घटना न घडण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात प्रबोधनाचे कार्यक्रम राबविणे, शाळांमध्ये विज्ञानाधारित चर्चा आयोजित करणे आणि अंधश्रद्धेविषयी जागृती घडविणे याची मागणी नागरिक व सामाजिक संस्थांकडून केली जात आहे.
अंधश्रद्धेविरुद्धची लढाई ही केवळ एका संस्थेची नाही; तो संपूर्ण समाजाचा लढा आहे. सावळजच्या स्मशानभूमीत आढळलेला हा प्रकार या गोष्टीची पुन्हा जाणीव करून देणारा ठरला आहे. भीती नव्हे, विवेक; अंधश्रद्धा नव्हे, विज्ञान अशी मानसिकता निर्माण केल्याशिवाय समाजाची खरी प्रगती शक्य नाही, असा सुर तालुक्यात उमटताना दिसतो आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. सावळजमधील प्रकारानंतर पुरोगामी संघटनांनी मागणी केली आहे की, जादूटोणा करणारे, अफवा पसरवणारे व लोकांना भ्रमित करणाऱ्यांवर तत्काळ या कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. कायद्याची कडक अंमलबजावणीच अंधश्रद्धेला रोखू शकते, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.